Thursday, June 29, 2017

लोकप्रतिनिधी कि मालक?


शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार श्री रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याचे वृत्त सध्या चर्चेमध्ये गाजते आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानात बसण्याच्या जागेवरुन वाद झाला. त्यानंतर एअर इंडियाचा कर्मचारी आणि गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. लोकप्रतिनिधी आणि त्यांचे असे किस्से हे काही नवीन नाही. यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक किस्से लोकांनी वेळोवेळी चर्चिले आहेत. कोणी आपलीच मनमानी करतो तर कोणी आपल्यासाठी ट्रेन अथवा विमानाच्या वेळा बदलतो. हे प्रकरणही त्याच मालिकेतील पुढचा भाग आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
रवींद्र गायकवाडांकडे याबद्दल वृत्तवाहिन्यांनी विचारणा केली असता आपण कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या या कृतीचे उद्दामपणे समर्थनच करताना ते दिसत आहेत. लोकप्रतिनिधी असलेल्यांना आवश्यक तेवढा मान सन्मान दिला जावा याबद्दल काहीच दुमत असणार नाही. काहीतरी कर्तृत्व असल्यानेच त्यांना लोकांनी निवडून दिले असावे. परंतु आपल्या पदाचा, समाजातील स्थानाचा आणि एकूणच अस्तित्वाचा इतरांना त्रास होणार नाही असे वर्तन राखणे हे अशा लोकप्रतिनिधींचे कर्तव्यही आहे. मात्र बहुतांश वेळा असे होताना दिसत नाही. देशाचा पंतप्रधान स्वतःला प्रधानसेवक म्हणवून घेत असताना खासदारापासून ते साध्या नगरसेवकांपर्यंत अनेकजण आपण स्वतः जनतेचे मालक असल्याच्या अविर्भावात हिंडताना दिसतात.
आपण लोकप्रतिनिधी आहोत म्हणजे केवळ आपण आपल्या मतदारसंघाचे प्रश्न लोकसभा-विधानसभेत मांडले की आपले काम झाले असे नाही. सार्वजनिक जीवनात काम करताना आपली वर्तणूक ही आपण ज्यांचे प्रतिनिधित्व करतो त्यांना अभिमान वाटेल अशीच ठेवली पाहिजे, कमीत कमी त्यांना लाज आणणारी असू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु हा मुद्दा अनेकदा दुर्लक्षित होतो. अर्थात, अत्यंत साधेपणाने राहणारे आणि सामान्य कार्यकर्त्यांशीही अतिशय अदबीने बोलणारे अनेक नेते होऊन गेले आणि आजही आहेत. त्यांच्याविषयी प्रसारमाध्यमेही काही सांगत नाहीत कारण अशा गोष्टींना TRP नसतो.
अर्थात हा मुद्दा केवळ सत्ता हाती असलेल्या राजकारण्यांपुरता मर्यादित नाहीये. विविध क्षेत्रात अधिकारपदावर असणाऱ्या अनेक लोकांमध्येही याची लागण झालेली आढळून येईल. अगदी गावच्या तलाठ्यापासून जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आणि नगरपालिकेतील जन्म-मृत्यू नोंदणी करणाऱ्या कारकुनापासून ते मंत्रालयातील सचिवांपर्यंत अनेकजण आपल्या अधिकाराच्या गुर्मीत वावरताना दिसतील. समाजाच्या याच घटकांचे प्रतिनिधित्व केल्यामुळे आपले आमदार-खासदार असे वागतात की लोकप्रतिनिधी असे असल्याने खालचे लोक त्यांचे अनुकरण करतात हा प्रश्न म्हणजे कोंबडी आधी की अंडे आधी याच्याइतकाच कठीण आहे.
असं म्हणतात की दैनंदिन वर्तणुकीवरून एखाद्याच्या स्वभावाची,वृत्तीची आणि चारित्र्याची परीक्षा केली जाते. अजून थोडी कठीण परीक्षा करायची असेल तर हलाखीची परिस्तिथी आली तर माणूस कसा वागतो त्यावरून करता येते. अर्थात हलाखीच्या परिस्थितीमध्येही धैर्य, संयम आणि चांगुलपणा धरून ठेवणारे अनेकजण मिळतात. पण जर एखाद्याच्या वृत्तीची खरी परीक्षा पाहायची असेल तर त्याच्या हाती अधिकार आणि सत्ता असताना केलेल्या त्याची वागणूक कशी आहे यावरून पाहता येईल. दुर्दैवाने अधिकार आणि सत्ता हाती आल्यावर अनेकांची मदांध आणि दुराग्रही बाजूच पुढे येताना दिसते. 
रवींद्र गायकवाडांच्या प्रकरणात काय सत्य आहे ते कालांतराने उघड होईलच. सर्व भारतीय विमान कंपन्यांनी एकत्रितपणे त्यांच्यावर बहिष्कार घातला असून त्यांची परतीची तिकिटे रद्द केली आहेत. सरकारही काही कायदेशीर कारवाई करता येईल का याविषयी आढावा घेत आहे आणि शिवसेना नेतृत्वानेही आपल्या खासदाराच्या वागणुकीची दाखल घेत त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी बोलावले आहे. अर्थात लोकशाहीमध्ये अशा लोकांचा उन्माद उतरवण्याची संधी जनतेकडे आहे आणि वेळोवेळी जनतेने त्याचा वापरही केला आहे. फळांनी लगडलेला वृक्ष जसा झुकतो तसेच सत्तेच्या अधिकारपदावर असणारे लोक त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव होऊन विनम्रपणे वागतील तोच सुदिन.
(सदर लेख marathi.rightlog.in वर मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झालेला आहे)

No comments:

Post a Comment