Tuesday, December 19, 2017

२०१९ चा शंखनाद


गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकांचे सूप वाजले आणि आता हा आठवडा विश्लेषणांमध्ये खर्ची पडेल. भाजपने गुजरात राखत हिमाचल प्रदेश काँग्रेसकडून हिसकावले म्हणून भाजपचे लोक आनंद साजरा करतील. तर आपल्या नव्या अध्यक्षाने गुजरातमध्ये भाजपच्या तोंडाला कसा फेस आणला याच्या चर्चा काँग्रेसी करतील. या दोन्ही पक्षात नसलेले आपापल्या सोयीप्रमाणे निकालांचा आढावा घेतील आणि प्रसारमाध्यमे आठवडाभरानंतर आता नवा TRP कुठे मिळेल याची चिंता करतील. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निकालानंतरच्या भाषणातून २०१९ साठीचा शंखनाद केला आहे यात काही संशय नाही.

गुजरात आणि हिमाचलच्या यशापयशातून दोन्ही पक्षांना काही शिकण्यासारखे आहे आणि त्यानुसार सुधारणा करणे गरजेचे आहे. पण त्यासाठी आधी आपले काही चुकले आहे हे समजणे जास्त महत्वाचे आहे.  पाटीदार आंदोलनाची पार्श्वभूमी, हार्दिक पटेल-जिग्नेश मेवानी-अल्पेश ठाकोर या युवकांची साथ, GST आणि नोटबंदीमुळे व्यापारी वर्गातील तथाकथित नाराजी, सौम्य हिंदुत्वाचा पुरस्कार केलेले राहुल गांधी, २२ वर्षांपासून असलेली भाजपची सत्ता आणि त्यात भर म्हणून यंदा भाजपाकडे मुख्यमंत्रीपदासाठी मोदींसारखा प्रभावी चेहरा नव्हता. एवढे सगळे जमून आले म्हणजे काँग्रेसला विजयासाठीची चांगली संधी होती. एवढे असूनही आपण सत्तापरिवर्तन का घडवून आणू शकलो नाही याचा विचार काँग्रेस करेल अशी आशा आहे. अर्थात गेल्या वेळच्या ६१ वरून आता ८० पर्यंत पोचलो यात आनंद मानायचा असेल तर मग विषयच संपला. काँग्रेसप्रमाणेच भाजपलाही आपल्या यशाची मीमांसा करण्याची गरज आहे. गुजरात हे नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे गृहराज्य असल्याने हा विषय भाजपच्या प्रतिष्ठेचा होता. २२ वर्षाच्या सत्तेमुळे झालेले प्रस्थापितविरोधी वातावरण असूनही आपण सत्ता कायम ठेवली म्हणून भाजपने प्रकटपणे आपली पाठ थोपटून घ्यावी. पण आपण अपेक्षेप्रमाणे यश मिळवू शकलो नाही हे भाजप नेते खाजगीत मान्य करतील. आणि हे मान्य करता आले तरच काही दुरुस्ती करता येईल.

अर्थात २०१९ चा विचार करायचा असेल तर काही महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकावा लागेल. यापैकी महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रभावी प्रादेशिक नेतृत्व. मोदी-शाह असोत नाहीतर राहुल गांधी, राष्ट्रीय नेते देशात किती ठिकाणी पोहोचू शकतात याला मर्यादा असणार आहेत. त्यामुळे प्रभावी प्रादेशिक नेते राष्ट्रीय नेतृत्वाच्या खांद्यावरचा काही भार आपल्या खांद्यावर वाहून नेऊ शकतात. भाजपाबद्दल सांगायचे झाले तर योगी आदित्यनाथ, वसुंधरा राजे, शिवराज सिंग चौहान, देवेंद्र फडणवीस, रमण सिंग, येडियुरप्पा, हेमंत बिस्वा शर्मा ,धर्मेंद्र प्रधान, मनोहर पर्रीकर अशा प्रभावी प्रादेशिक नेत्यांची फौज मोदी-शाह जोडीच्या मदतीला आहे. या नेत्यांना त्यांच्या त्यांच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जनाधार आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही वेळोवेळी प्रदेश नेतृत्वाचे हात बळकट केले आहेत. असे करताना हे लोक आपली जागा बळकावतील अशी भीती केंद्रीय नेतृत्वाला वाटत नाही. याच्या अगदी विरुद्ध, काँग्रेसने स्थानिक नेतृत्वाला एका ठराविक मर्यादेपलीकडे बळ न देण्याचे धोरण अमलात आणले आहे. त्यामुळे राज्य पातळीवरील प्रत्येक लहानमोठा निर्णय केंद्रीय नेतृत्वाला विचारल्याशिवाय होऊ शकत नाही. पुरेसे स्वातंत्र्य नसल्याने आणि आपण फार लोकप्रिय झाल्यास आपले पंख कापले जातील या भीतीने काँग्रेसचे स्थानिक नेते पूर्ण क्षमतेने काम करताना दिसत नाहीत. आंध्र प्रदेशातील वाय एस राजशेखर रेड्डींनंतर पंजाबातील अमरेंद्र सिंगांचा अपवाद वगळता काँग्रेसमध्ये प्रभावी प्रादेशिक नेत्याचा अभाव प्रकर्षाने दिसून येतो आहे.

दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या दूरदृष्टीमध्येही सध्या प्रचंड तफावत आढळते. आगामी काळात काय आव्हाने आहेत आणि त्याचा कसा सामना करता येईल याचा विचार करण्यामध्ये आजच्या घडीला भाजप काँग्रेसपेक्षा फार पुढे आहे असे चित्र दिसते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड मध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. परंतु आता मित्र पक्षांपैकी शिवसेना आणि तेलगू देसम पक्ष सरकारवर नाराज आहेत. अकाली दलाची शक्ती क्षीण झाली आहे. त्यामुळे पाच वर्षांनंतर हे यश टिकवणे काहीसे कठीण असेल. मोदी आणि शहांना याची जाणीव आहे. आणि त्यामुळेच २०१४ नंतर भाजपने नव्या प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्यावर भर दिला आहे. केरळ, बंगाल, ओडिशा आणि पूर्वोत्तर राज्यातील गेल्या दोन वर्षातील स्थानिक निवडणुकांमध्ये याची झलक पाहायला मिळते. त्याचप्रमाणे तामिळनाडूमधील AIADMK  सोबत जुळवून घ्यायचे प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत आहेत. बिहारमध्ये नितीशना पुन्हा  NDA मध्ये सामावून घेणे हाही याचाच एक भाग आहेत. २०१४ मध्ये जिथे पक्ष कमी पडला तिथे सुधारणा करण्याचा आणि जिथे प्रचंड यश मिळाले तिथे यशाची पुनरावृत्ती न झाल्यास त्याचा पर्याय शोधायचा प्रयत्न भाजप नेतृत्वाने गेल्या ३-४ वर्षात केला आहे. पश्चिम आणि उत्तर भारतात २०१४ साली मिळालेले यश २०१७ मध्ये थोडे कमी झाले तर त्याची भरपाई करण्यासाठी पूर्व आणि दक्षिण भागात अधिक यश मिळवण्यावर भाजपचा भर असेल.

भाजपच्या निवडणूक लढवण्याचा पद्धतीबद्दलही अनेक लोकांनीं अनेक प्रकारे चर्चा केली आहे. २००७ च्या गुजरात निवडणुकीमध्ये अमित शहांनी पन्ना प्रमुख नावाची संकल्पना मांडली आणि त्या वर्षीच्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये याचा चांगला परिणामही दिसून आला. मतदार यादीतील प्रत्येक पानावर साधारण २५-३० मतदारांची नावे असतात आणि प्रत्येक पन्ना प्रमुखाकडे त्या २५-३० जणांना मतदानाच्या दिवशी केंद्रावर घेऊन येणे आणि भाजपच्या बाजूने मतदान घडवून आणणे याची जबाबदारी असते.  पण पन्ना प्रमुख केवळ निवडणुकीच्या दिवशी सक्रिय होत नाहीत. निवडणुकीच्या आधीपासून आपल्या पानावरील मतदारांचा कौल काय आहे याचा अभ्यास हे पन्ना प्रमुख करतात. त्याच सोबत बूथ, मतदारसंघ आणि जिल्हा पातळीवरील निरीक्षकांच्या माध्यमातून ही माहिती गोळा करून वातावरण आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा भाजपाची संघटना अमित शहांनी बांधली आहे आणि हेच त्यांच्या गेल्या काही वर्षातील यशाचे गमक आहे. भाजपच्या या प्रयत्नांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील इतर संघटनांचे पाठबळ मिळते.  भाजपच्या याच रणनीतीचा मुकाबला करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न जागोजागी तोकडा पडताना दिसत आहे.

काँग्रेसला भाजपशी दोन हात करण्यासाठी जेवढे जास्त सहयोगी मिळतील तेवढे गोळा करावे लागतील. आपापल्या प्रदेशात भाजपकडून मार खाल्लेले प्रादेशिक पक्ष सहजपणे काँग्रेसच्या गोटात दाखल होऊ शकतात. पण त्यासाठी आपण एक सशक्त पर्याय आहोत हे काँग्रेसला सिद्ध करावे लागेल. संघटना नव्याने बांधायची असेल तर दीड वर्षाचा कालावधी पुरेसा आहे की नाही यावर मतभिन्नता असू शकेल. पण देशाच्या कानाकोपऱ्यात काँग्रेसचे अस्तित्व आहे हे नाकारता येणार नाही. नोटबंदी आणि ऑनलाईन पेमेंट यामुळे सामान्य जनतेला थोडा फरक पडला असला तरी अनेकांची दुकाने बंद झाली आहेत. अशा सगळ्यांचा भाजपाला विरोध आहे. NGO  ना मिळणाऱ्या परदेशी निधीवर बंधने आणल्यामुळे अनेक NGO सुद्धा भाजपाला हटवण्यासाठी उत्सुक आहेत. काँग्रेसला त्यांचाही फायदा होऊ शकेल. प्रसारमाध्यमांमधील अनेक पत्रकार भाजप सरकारला खाली खेचण्यासाठी देव पाण्यात ठेऊन बसलेत. तेसुद्धा भाजपाविरोधात विखारी प्रचार करू शकतील. अर्थात, या साऱ्यांचा फायदा घेण्याइतकी काँग्रेस मजबूत आहे का हाच मोलाचा प्रश्न आहे.

गुजरात निवडणुक निकालानंतरचे मोदींचे भाषण 'जीतेगा भाई जीतेगा, विकास ही जीतेगा' या घोषणेने संपले. त्यावरून विकास हाच भाजपचा यापुढेही (जाहीरपणे सांगण्यापुरता तरी) मुद्दा असेल हे स्पष्ट होते. पण खरंच केवळ विकास या मुद्द्यावर मोदी पुन्हा बाजी मारू शकतील? जानेवारी २०१८ मध्ये राम मंदिर विषयाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु होईल. निकाल काहीही लागला तर देशात ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेली ३ दशके भाजपचे राजकारण राम मंदिर मुद्द्याला धरून चालले आहे आणि जर मंदिराच्या बाजूने निकाल लागला तर भाजप त्याच्या पुरेपूर फायदा उचलणार हे नक्की. आणि त्यांना असा फायदा मिळू नये म्हणून काँग्रेसही सर्वतोपरी प्रयत्न करेल. सरकार स्थापन होऊन साडेतीन वर्षांनंतरही भ्रष्टाचाराचा एकही आरोप सरकारवर झाला नाही हा मात्र काँग्रेससाठी चिंतेचा विषय असणार आहे. त्यामुळे सरकारच्या विकासाच्या दाव्याला विरोध करण्यासाठी एखादा भावनिक मुद्दा तयार करण्याकडे काँग्रेसचा कल असेल. तिहेरी तलाक मुद्द्यावर कायदा करण्यावरून मुस्लिम समाजात उभी फूट पडली आहे. सरकारने धार्मिक बाबीत ढवळाढवळ करू नये असे मानणाऱ्यांचा एक गट तर बहुतांश महिला आणि उदारमतवादी लोकांचा दुसरा. त्यामुळे बहुसंख्य-अल्पसंख्य असा मुद्दा काँग्रेसला यापुढे फारसा फायदेशीर असेल असे वाटत नाही. हे काँग्रेसच्याही लक्षात आले असावे. राहुल गांधींच्या गुजरातमधील मंदिर भ्रमंतीवरून हा अंदाज काढता येणे शक्य आहे. अर्थात येणाऱ्या १६-१७ महिन्यात किती मुद्दे तयार होतात, कोणाची किती प्रकरणे बाहेर येतात आणि कोणकोणते नेते कोणकोणत्या कळपात दाखल होतात हे आत्ताच सांगता येणार नाही.

पण दोन्ही महत्वाचे राष्ट्रीय पक्ष आणि आपापल्या राज्यात प्रभावी असलेले प्रादेशिक पक्ष तयारी कशी करतात हे पाहणे कुतूहलाचे ठरेल. दीड वर्ष हा तसा मोठा काळ आहे. २०१८ मध्ये एकूण आठ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार असून त्यामधून हळूहळू संकेत मिळतीलच. गुजरातेत निवडणुकीआधी महिनाभरपर्यंत काँग्रेसने मुसंडी मारली होती पण तीन चार आठवड्यात मोदींनी पारडे फिरवले. पण तीन आठवड्यात जसा गुजरात पिंजून काढता आला तसा पूर्ण देश पिंजून काढायला तीन आठवडे पुरणार नाहीत हे मोदींच्या लक्षात आले आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश गमावून आणि गुजरातमध्ये परिवर्तन घडवण्यात अपयशी ठरवूनही काँग्रेस आपला नैतिक विजय कसा झाला हे सांगण्यात मश्गुल आहे आणि निकाल लागायच्या एक दिवस आधी मोदी मेघालयमध्ये प्रचाराचा नारळ फोडून आलेसुद्धा. राहुल गांधी नव्याने काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. आपण जर काही वेगळे केले नाही तर काही वेगळे परीणाम दिसणार नाहीत नाही हे त्यांच्या लक्षात आले म्हणजे झाले. पण काँग्रेसचा गेल्या ३-४ वर्षातील प्रवास पाहता २०१९ च्या मे महिन्यातही आपण हेच ऐकण्याची दाट शक्यता आहे  - मै, नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर कि शपथ लेता हू ......  

Tuesday, October 24, 2017

देणे ब्लूमिंग्टनचे

IT क्षेत्रात काम करत असणाऱ्या अनेकांच्या पायाला भिंगरी लागलेली असते, तशीच माझ्याही पायाला लागली आणि गेल्या १०-१२ वर्षात अनेक ठिकाणी वास्तव्य करायचा योग्य आला. साधारण वर्षभर वास्तव्य केल्यावर एखादे शहर सोडताना लागणारी हुरहूर तशी सवयीचीच. पण यावेळची गोष्ट जरा निराळी होती.  ब्लूमिंग्टनने आम्हाला एवढं भरभरून दिलं की हे छोटंसं गाव आपल्याला निरोप घेताना एवढं रडवेल अशी कल्पनाही मी केली नव्हती.

२०१६ च्या जून मध्ये माझा कॅन्ससमधील ओव्हरलॅन्ड पार्क मधला प्रोजेक्ट संपला आणि मग नेहमीप्रमाणेच नवा प्रोजेक्ट, नवं शहर, नवे लोक अशा सगळ्या नव्या गोष्टीसाठी आम्ही तयार झालो. लवकरच समजलं की आता आपला नवा पत्ता ब्लूमिंग्टन असणार आहे. फिरण्यासाठी शिकागोला गेलो असता, शिकागोहून ओव्हरलॅन्ड पार्कला परत येताना आम्ही वाटेत ब्लूमिंग्टनला भेट दिली आणि हे शहर नसून एक लहानसं गाव आहे अशीच आमची पहिली प्रतिक्रिया झाली. पण पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणून आम्ही ठरल्याप्रमाणे जुलै २०१६ मध्ये ब्लूमिंग्टनला राहायला आलो.

पण आमचे सगळे अंदाज चुकवणारं हे गाव निराळंच होत. या गावाने आम्हाला अगदी अलगद जवळ केलं आणि आल्यापासून तिसऱ्याच दिवशी आम्ही मराठी मंडळाच्या परिवारात सामील झालो. गणेशोत्सवात लहान मुलांच्या कार्यक्रमाच्या मीटिंगपासून सुरु झालेला हा प्रवास मग एकामागोमाग एक नवे अनुभव देत गेला. गौतम आणि गौरी करंदीकरांचे घर हाच ब्लूमिंग्टनच्या मराठी मंडळाचा पत्ता. अनेक गोष्टी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा करत होतो आणि या सगळ्यातून मला माझी नवी ओळख होत गेली. मग तो ढोलपथकातला सहभाग असो नाहीतर स्किटमधे केलेली लहानशी भूमिका. स्टेजवर काम करणं हे मला इतका आनंद देऊन गेलं की आपण हे आधी का केलं नाही याचं मला आश्चर्य वाटलं आणि त्यानंतर जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा स्टेजवर काम करायला नाही म्हणायचे नाही हे मी मनोमन ठरवून टाकलं.

त्याचप्रमाणे ब्लूमिंग्टनमध्ये हिंदू स्वयंसेवक संघाची (HSS) शाखा लागते असं समजलं आणि मी लगेच तिथेही हजेरी लावली. फार वर्षांपूर्वी शाळेत असताना मी संघाच्या शाखेत जात असे, पण ब्लूमिंग्टनमध्ये शाखेवर हजेरी लावेन अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. शाखेच्या लोकांनीही मला प्रोत्साहन देत अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि मी माझ्या कुवतीप्रमाणे त्या पार पाडल्या. अर्थात संघात जबाबदारी कुणा एकाची अशी नसतेच. तुमची जबाबदारी पार पाडायला प्रत्येकजण तुम्हाला मदत करतो. शाखेच्या निमित्ताने मी अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झालो आणि त्यामुळे अनेक नव्या ओळखी झाल्या ज्यांचा मला आजही माझ्या नव्या जागी म्हणजे अटलांटामध्ये उपयोग होतो आहे.

दरवर्षी सादर होणारी नाटकं हे ब्लूमिंग्टनच्या मराठी मंडळाचं खास वैशिष्ट्य. गौतम करंदीकरांच्या दिग्दर्शनाखाली गेली अनेक वर्षे ही नाटकं सादर होत आली आहेत. दरवर्षीचं नाटक हे ब्लूमिंग्टनबरोबरच मिलवॉकी आणि सेंट लुई अशा दोन ठिकाणीही सादर केलं जातं. या नाटकासाठीची पात्रनिवड अतिशय गुप्त पद्धतीने होते. "आमच्या नाटकात काम करायला या होSSS" असं जाहीर आमंत्रण दिलं जात नाही. गौतमदादांच्या मनात नाटक ठरतं आणि त्यांना आसपासच्या लोकांमध्ये कलाकार दिसतात. भूमिकेला साजेसे कलाकार हेरून त्यांना आमंत्रण जातं आणि तालीम सुरु होते. परंतु मराठी मंडळाकडून नाटकाची जाहिरात प्रकाशित होईपर्यंत "कोणतं नाटक?", "कोण कलाकार?" यापैकी काहीही गोष्टी नाटक टीमबाहेरच्या जगाला समजत नाहीत.

स्किटमध्ये काम केल्यावर स्टेजवर काम करायची माझी इच्छा होतीच. त्यामुळे एकदा नोव्हेंबर मध्ये मी अंदाज घेत घेत गौतमदादांना नाटकाबद्दल विचारलं आणि म्हणालो की नाटकात काही काम असेल तर सांगा. तेव्हा मला समजलं कि नाटक आधीच ठरलं होतं आणि कलाकारही फायनल झाले होते. फार खिन्न मनाने घरी आलो आणि काही दिवसातच काही अजून काही अशीच माणसं सापडली. त्यापैकी प्रत्येकाला नाटकात काम करायचं होतं असं नाही पण लहानसं स्किट करायला ही सगळीच मंडळी उत्सुक होती. आम्ही सर्वानी मिळून एक नौटंकी ग्रुप तयार केला आणि मग एक स्किट लिहून संक्रांतीला सादर केलं. विनिताला काही दिवसांनी नाटकासाठी बदली कलाकार म्हणून आमंत्रण आलं. बाकीच्या आम्ही मात्र दुधाची तहान ताकावर भागवली. काही दिवसातच शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करायचं ठरलं आणि त्यानिमित्त सादर होणाऱ्या स्किटच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची संधी मला मिळाली. शिवजयंतीच्या स्किटमध्येही मी एक भूमिका करून घेतली. संक्रांत आणि शिवजयंती अशा दोन्ही स्किटमध्ये स्टेजवर जायची हौस भागवून घेतली खरी, पण मराठी मंडळाच्या नाटकात काम करायचं मात्र राहून गेलं.

या सगळ्यांबरोबर ब्लूमिंग्टनने आम्हाला मित्रांचा गोतावळा दिला. गेल्या वर्षी आम्ही ब्लूमगावात आल्यावर गणपतीच्या सुमारास खूप नव्या ओळखी झाल्या. मग नवरात्रीच्या काळात काही जणांशी ओळख दृढ झाली आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आम्ही पाच कुटुंबांनी एकत्र भेटायचं ठरवलं. काही नव्याने आलेले आणि काही थोडे जुने असे असलेल्या आमची ही एक सहज साधी भेट होती. आमच्यापैकी सुशील आणि अनुजा ब्लूमगावात अनेक वर्षे राहिलेले तर अण्वेश आणि वल्लरी हे आमच्या आधी काही आठवडे गावात आलेले. योगेश-सीमा आणि हितेश-स्मिता हे गावात अगदी जुने नसले तरी आमच्यापेक्षा ब्लूमगावचे दोन पावसाळे जास्त पाहिलेले (ब्लूमिंग्टनची थंडी बघता खरंतर थंडीचे दोन मोसम जासत पाहिलेले असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल). पण या एका भेटीत बंध असे जुळून आले की जणू काही आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत असू. त्यानंतर आम्ही नियमितपणे एकत्र भेटू लागलो. कधी कुणाचा वाढदिवस म्हणून तर कधी एखादी लहानशी सहल म्हणून, तर कधी उगाचच कसल्याही कारणाशिवाय. तसं पाहिलं तर अशी अनेक माणसं आहेत ज्यांना मी वर्षानुवर्षे ओळखतो, त्यांच्याकडे जाणंयेणंही असतं पण त्यांच्यासोबतचं नातं त्यापुढे सरकत नाही. पण या ब्लूमगावकरांसोबत एका वर्षात एवढे मिसळून गेलो की विचारता सोय नाही. या लोकांनी न मागता आम्हाला भरभरून दिलं. एवढं की त्याचं काही मोजमाप करता येणार नाही.

ब्लूमिंग्टनला आल्यापासून वर्षभरातच पायाला लागलेली भिंगरी पुन्हा एकदा फिरली आणि आम्हांला ब्लूमिंग्टन सोडावं लागणार अशी चिन्ह दिसायला लागली. ब्लूमिंग्टनमधेच राहून नव्या प्रोजेक्टवर काम करता आले तर बघ असा आपुलकीचा सल्लाही काही जणांनी दिला. त्यानुसार मी काही प्रयत्न करून पहिलेही. पण आपण ज्या देशात असू तिथल्या सरकारचे कायदे तर पाळावेच लागणार. शेवटी आम्ही इथे येताना, ज्या शहरात काम त्या शहरात मुक्काम अशा धोरणाखालीच आलो आहोत. त्यामुळे ब्लूमगाव सोडावे लागले. मनाची तयारी होत नव्हती आणि आता जायचेच आहे तर शक्य तितक्या उशिरा जावे असेही वाटत होते.

ब्लूमिंग्टन सोडायच्या आधीचे २ आठवडे अनेक मित्र-आप्तेष्टांनी आम्हाला संध्याकाळच्या जेवणाचे निमंत्रण दिले आणि आम्ही वार लावल्यासारखे रोज कुणाच्या ना कुणाच्या घरी जेवायला जाऊ लागलो. यावेळी होणाऱ्या गप्पांना एकमेकांपासून लांब जाण्याच्या जाणिवेचा बॅकड्रॉप होता. भेटून चांगलं वाटत होतंच पण या भेटींना "पुन्हा कधी भेट होईल माहित नाही" अशा निराशेशी झालरही होती. अखेरीस आमचा ब्लूमिंग्टन सोडायचा दिवस आला. घरचे सामान आधीच पाठवून दिले होते. त्यामुळे आठवड्यासाठी लागणारे साहित्य सोबत ठेवून आम्ही निघायचे ठरवले. सकाळी १० वाजता निघायचं ठरवलं पण पाय निघेना. सकाळी सगळे ब्रेकफास्टला एकत्र जमलो आणि मग अजून काही मित्रांनीही निरोप देण्यासाठी हजेरी लावली. आजचा एक दिवस रहा आणि उद्या निघा अशीही गळ घातली गेली. पण चोवीस तासानंतरही निरोप घेताना परिस्थिती तीच असणार होती. त्यामुळे मनाचा हिय्या केला आणि ठरल्या वेळेपेक्षा ३ तास उशिराने आम्ही अटलांटाला जाण्यासाठी गाडीत बसलो.

माझं जन्मगाव खेड आणि त्यानंतर शाळा कॉलेजच्या निमित्ताने जिथे राहिलो ते रत्नागिरी सोडलं तर इतर दुसऱ्या कुठल्याही गावापेक्षा ब्लूमिंग्टनने आम्हाला सर्वात जास्त लळा लावला. पण कोणत्या म्युन्सिपालिटीचं पाण्याचं बिल कोणी किती दिवस भरायचं हेही नशिबाने आधीच लिहिलेलं असतं. त्यानुसार ब्लूमिंग्टनमधील शेवटचं पाण्याचं बिल भरलं आणि आणि त्यातलंच थोडंसं पाणी डोळ्यात ठेऊन आम्ही ब्लूमिंग्टनचा निरोप घेतला.

Wednesday, August 9, 2017

गुजरात राज्यसभा निवडणूक आणि राष्ट्रीय राजकारण


          साधारणपणे राज्यसभा निवडणूक ही एवढ्या शांतपणे होऊन जाते की सामान्य माणसाला पत्ताही लागत नाही. पण काल ८ ऑगस्ट ला गुजरात राज्यातील तीन राज्यसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा केवळ पत्ता लागला एवढेच नाही तर ही निवडणूक २ आठवड्यांपासून गाजत राहिली आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तर क्रिकेटच्या २०-२० सामन्याप्रमाणे उत्कंठावर्धक होत गेली. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागला यापेक्षा या निवडणुकीदरम्यान झालेल्या घटनाक्रमाचा पुढील राजकारणावर होणार परिणाम जास्त महत्वाचा आहे.

          गुजरातमधून राज्यसभेवर जाणाऱ्या तीन खासदारांचा कालावधी संपल्यामुळे गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली. निवृत्त होणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन आणि काँग्रेसचा एक खासदार होता. गुजरात विधानसभेतील भाजप आणि काँग्रेसचे संख्याबळ लक्षात घेता पुन्हा एकदा भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक खासदार निवडून येईल हे स्वाभाविकच होतं. भाजपने आपल्या निश्चित असलेल्या दोन जागांसाठी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले. काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आणि अतिशय निरस ठरू पाहणाऱ्या निवडणुकीचे स्वरूप पालटून गेले.

शंकरसिंह वाघेला हे पूर्वाश्रमीचे भाजपाचे बडे प्रस्थ होते. १९९५ मध्ये गुजरात विधानसभा निवडणूक भाजपने जिंकल्यावर वाघेला मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. त्यांना डावलून केशूभाई पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले. यामध्ये त्या वेळी राज्याच्या संघटनेमध्ये सक्रिय असलेल्या नरेंद्र मोदींचा केशूभाईंना असलेला पाठिंबा हे एक कारण होते असे म्हणतात.वाघेलांनी बंड केले आणि मग भाजपने केशूभाईंना हटवून त्यांच्या जागी वाघेला समर्थक असलेल्या सुरेश मेहतांना मुख्यमंत्री केले. पुढे १९९६ मध्ये लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर वाघेलांनी आपल्या समर्थकांसह भाजपाला रामराम ठोकला, स्वतःचा पक्ष काढला आणि काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. तेही दुकान फार काळ चालले नाही आणि मग १९९७ मध्ये वाघेलांनीं दिलीप पारीख यांना खुर्ची दिली. पुढे १९९८ मध्ये वाघेलांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि काँग्रेसी बनले. त्याच वर्षी राज्यात मध्यावधी निवडणूक होऊन भाजपने सत्ता काबीज केली ती आजतागायत टिकून आहे. आता १८-१९ वर्षानंतर वाघेलांना काँग्रेसमध्ये करमेनासे झाले आणि यंदा विधानसभा निवडणूक होऊ घातलेली असताना आणि ऐन राज्यसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर वाघेलांनी काँग्रेसला रामराम केला.

विधानसभेमध्ये स्वतःचे ५७, राष्ट्रवादीचे २ आणि जनता दल (यु) चा एक असे ६० आमदार पाठीशी असताना आणि विजयासाठी केवळ ४५ मतांची गरज असताना अहमद पटेलांना निवडून येण्याविषयी काहीच अडचण नव्हती. पण ऐन निवडणुकीआधी ६ आमदारांनी भाजपचा रास्ता पकडला. वाघेला आणि समर्थक विरोधात उभे ठाकले. राष्ट्रवादीने आपल्या लौकिकाला जागून ठामपणे कोणाचीच बाजू घेतली नाही आणि जनता दल (यु) ने बिहारमध्ये भाजपशी सलगी केल्याने ते एक मतही मिळेल याची शाश्वती राहिली नाही. अशा प्रकारे २ महिन्यांपूर्वी ६० जणांचे पाठबळ आता ४४ वर येऊन ठेपले. आता या लोकांमध्ये अजून फूट पडू नये म्हणून काँग्रेसने २ आठवड्यांपूर्वी या ४४ लोकांना काँग्रेसशासित कर्नाटकमधील एका रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवले आणि ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. अहमद पटेल हे सोनिया गांधींचे सल्लागार आणि त्याचमुळे पटेलांचा विजय म्हणजे सोनियांच्या प्रतिष्ठेची लढाई होती. गुजरातमध्ये पूरस्थिती असताना आपले आमदार कर्नाटकातील फाईव्ह स्टार रेसॉर्टमधे ठेवणे हे ३ महिन्यावर आलेल्या निवडणुकीसाठी धोक्याचे आहे हे न समजण्याइतके काँग्रेस नेते मूर्ख नाहीत. पण अहमद पटेलांच्या विजयासाठी हा धोका पत्करला यातूनच काँग्रेससाठी या निवडणुकीचे किती महत्व होते ते दिसून येते.

अमित शाह निवडणूक लढण्याच्या कलेमध्ये कुशल आहेत आणि निवडणूक लढताना ते पूर्ण तयारीनिशी रणनीती आखताना दिसतात. काँग्रेसमध्ये असलेल्या दुफळीचा त्यांनी फायदा घ्यायचे ठरवले आणि काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या बलवंतसिंह राजपूत यांना भाजपचा तिसरा उमेदवार म्हणून उभे केले. काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी आपले मत दिल्यावर मतपत्रिका पेटीत टाकण्याआधी भाजपच्या तीनही उमेदवारांना दाखवली आणि हा निवडणूक प्रक्रियेचा भंग असून त्यांची मते रद्द करण्यात यावीत यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी अपेक्षित असताना काँग्रेस आणि भाजपाने आपापली शिष्टमंडळे प्रत्येकी ३ वेळा निवडणूक आयोगाकडे पाठवली आणि आपापल्या भूमिका मांडल्या. रात्री ११ नंतर त्या दोन आमदारांची मते रद्द ठरवून मतमोजणी आटपाण्याचे आदेश दिले.हा नाटकीय क्रम एवढ्यावरच थांबला नाही. भारतीय जनता पार्टीने एक विडिओ प्रस्तुत केला आणि त्याआधारे भाजपाला मतदान करणाऱ्या दोन आमदारांनी काहीही चुकीचे केले नाही असे सांगत मतमोजणीला विलंब केला.

शेवटी रात्री १ च्या सुमारास भाजपच्या आक्षेपाला वाटाण्याच्या अक्षता लावत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतमोजणी झाली. दोन आमदारांची मते रद्द होताच निवडून येण्यासाठीची आवश्यक मते ४५ वरून ४४ वर आली आणि काँग्रेसने सुटकेचा निःश्वास सोडला. मतमोजणी पूर्ण होऊन अमित शहांना ४६, स्मृती इराणींना ४५ व अहमद पटेलांना ४४ मते मिळून राज्यसभेची खासदारकी मिळाली. भाजपाचे तिसरे उमेदवार बलवंतसिंह राजपूत यांना ३९ मते मिळाली. अहमद पटेलांच्या ४४ मध्ये काँग्रेसच्या ४१ आणि राष्ट्रवादी, जनता दल (यु) आणि भाजपच्या एका मताचा समावेश आहे. त्यामुळे पटेलांचा हा विजय खरंच विजय आहे का याविषयी प्रश्न उभा राहतो. जर त्या दोन आमदारांनी आपापली मतपत्रे उघड केली नसती तर पटेलांना ४४ आणि राजपूत यांना ४१ मते पडली असती आणि विजयासाठी आवश्यक ४५ मते दोघांपैकी कोणालाही न मिळाल्याने निकाल दुसऱ्या पसंतीच्या मतांवर गेला असता. आणि साहजिकच भाजपच्या जास्त आमदारांच्या जीवावर राजपूत सहज निवडून आले असते. अमित शहांनी जवळजवळ जुळवून आणलेला डाव तांत्रिक कारणामुळे उधळला गेला आणि काँग्रेसचे वस्त्रहरण होता होता राहिले.

निकाल लागले आणि एवढे नाट्य होऊन काँग्रेसचा एक आणि भाजपचे २ खासदार राज्यसभेत पोचले. आता दोनही पक्षांना या निकालांचे विश्लेषण करावे लागेल. ३ महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजपच्या एका आमदाराने काँग्रेसला मतदान केले. त्यासाठी कारण म्हणून पाटीदार समाजावर भाजपने केलेल्या अन्यायाविरोधात आपण मतदान केले असे त्यांनी सांगितले. पाटीदार आंदोलन सध्या थंड पडलेले दिसत असले तरी त्या प्रश्नाच्या अनुषंगाने राज्यसभा निवडणुकीत भाजपचे नाक कापले गेले. कारण दोन आमदारांची मते रद्द झाल्यानंतरही जर या भाजप आमदाराने काँग्रेसला मत दिले नसते तर भाजपचा विजय झाला असता. इथेही भाजपाला एका मताने दगा दिला आणि त्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या लोकांच्या काही आठवणी जाग्या झाल्या असतील यात शंका नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाला आपले घर व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींसारखा चेहरा नाही. पण दोन खासदार निवडून येण्याइतके बळ असताना दोनजण निवडून आले त्यामुळे भाजपासमोरचा प्रश्न काँग्रेसऐवढा भयंकर नाही असेच म्हणावे लागेल. तरीही पक्षाचा राष्ट्रव्यापी विस्तार करताना आणि नवे जोडताना जुने सुटत तर नाही ना याचे भान राखणे भाजपासाठी अत्यंत गरजेचे आहे.

अहमद पटेल विजयी झाले असले तरी हा विजय समाधानापेक्षा जास्त प्रश्न घेऊन उभा राहिला आहे. ६० जणांचे पाठबळ असताना जेमतेम तांत्रिक बाबीवर अखेरच्या क्षणी मिळालेला विजय आनंददायक असण्यापेक्षा चिंताजनकच आहे. शंकरसिंह वाघेलांसारखा मोठा नेता सोडून गेला आहे. राज्यात पूर आलेला असताना आपापल्या मतदारसंघात मदतकार्यात सहभागी होण्यापेक्षा एक राज्यसभेची जागा वाचवण्यासाठी कर्नाटकातील रिसॉर्टमध्ये पार्ट्या करणाऱ्या आमदारांना जनता सहजपणे माफ करू शकेल का याचेही उत्तर शोधावे लागेल. त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये आता जुने आणि नवे असे दोन गट स्पष्टपणे दिसतात. मतदानाच्या दिवशी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला राहुल गैरहजर राहिले हा निव्वळ योगायोग समजावा का? निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळावर नजर टाकली तर गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम, अंबिका सोनी अशी जुनी लोकंच दिसून आली. नव्या गटातील राहुल गांधी, ज्योतिरादित्य सिंदिया, सचिन पायलट आणि नव्यांच्या बाजूचे जुने दिग्विजय अशा लोकांनी फारसे लक्ष घातलेले दिसले नाही. सध्या काँग्रेसमध्ये सोनिया नंबर एक आणि राहुल नंबर दोन आहेत. पण सोनियांचा विश्वास राहुलपेक्षा अहमद पटेलांवर जास्त असावा आणि म्हणून राहुलना पटेल निवडून यायला नको होते का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजतरी आपल्यासमोर नाहीत.

ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये सध्याचा काळ काँग्रेसपुढे अस्तित्वाचे संकट घेऊन उभा आहे असे म्हटले आहे. मोदी आणि शाह यांचे राजकारण आक्रमक स्वरूपाचे असून जर काँग्रेसने स्वतःला नव्या परिस्थितीनुसार बदलले नाही तर काँग्रेस अप्रासंगिक होऊन जाईल असे मत त्यांनी प्रकट केले आहे. जयंती नटराजन, हेमंत बिस्वा शर्मा, रिटा बहुगुणा अशा काँग्रेसच्या अनेक लोकांनी राहुल गांधींच्या क्षमतेविषयी आणि कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. सध्याचे नेतृत्व नेहरू आणि इंदिरा गांधींच्या दशांशानेही सक्षम नाही. तेव्हा अशा गांधी परिवारासाठी काँग्रेससारख्या शतायुषी पक्षाला किती वेठीस धरावे याचा काँग्रेसजन लवकरच विचार करतील. सोनिया आणि राहुलचे राजकारणातील अस्तित्व काँग्रेस पक्षामुळे आहे तसेच काँग्रेस पक्ष सोनिया आणि राहुलमुळे नव्हे तर अनेक लहानमोठ्या नेत्यांमुळे आणि खोलवर रुजलेल्या कार्यकर्त्यांमुळे उभा आहे याचे भान काँग्रेसी लोकांना आले आणि कोणा एका कणखर आणि प्रबळ नेत्याकडे काँग्रेसची धुरा आली तर काँग्रेस वाचणे शक्य आहे. भाजप देशभरात पाय पसरत असताना एक मजबूत राष्ट्रव्यापी विरोधी पक्ष असणे भारतीय लोकशाहीसाठी आवश्यक आहे. नव्या सबळ नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष ही अपेक्षा पूर्ण करू शकतो. पण गांधी घराण्याच्या गुलामीचे जोखड मानेवरून काढून टाकायला आणि भाजपाला पर्याय ठरायला काँग्रेस इच्छुक आहे का हाच देशापुढील मोठा प्रश्न आहे.

Monday, July 31, 2017

नितीशकुमार: जुना गडी नवं राज्य

                   
                    २०१२ पासूनच नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात येण्याचे संकेत मिळत होते. तसेच बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांच्याही राष्ट्रीय राजकारणात महत्वाकांक्षा होत्या. त्यामुळे नितीशकुमारांनी नरेंद्र मोदींना नेहमीच आपला एक प्रतिस्पर्धी या रूपात पहिले. २०१३ साली नरेंद्र मोदींना भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार करताच नितीशकुमारांनी भाजपापासून काडीमोड घेतला आणि धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून मोदीविरोधाचा शंख फुंकला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत अनेकांची पुरती वाताहात झाली. अवघे २ खासदार निवडून आल्यावर नितीशबाबूंना आपल्या शक्तीची कल्पना आली आणि पुढच्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी एकेकाळचे सख्खे मित्र आणि त्यानंतरच्या काळातील पक्के वैरी लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसची मदत घेऊन सत्ता काबीज केली. नितीश, लालू आणि काँग्रेस यांनी साकार केलेल्या या संकल्पनेला महागठबंधन म्हणून संबोधले गेले आणि मोदींना थोपवण्याचा एक मार्ग विरोधकांना दिसू लागला. याच प्रकारे देशातील विविध भागात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन २०१९ मध्ये मोदींना धूळ चारण्याचे मनसुबे आखण्यात येऊ लागले.
                    परंतु केवळ वर्षभरातच बिहारच्या महागठबंधनाला तडे जाऊ लागले. १० वर्षाच्या कालावधीनंतर मिळालेली सत्ता राष्ट्रीय जनता दलाला पचली नाही आणि नितीशबाबूंची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले. भष्टाचाराने डोके वर काढले आणि लालूप्रसाद यादवांच्या घरातील प्रत्येकाची भ्रष्टाचाराची प्रकरणे एकामागोमाग एक बाहेर येत गेली. बायको, मुलगे, मुलगी आणि जावई सगळेच अडकल्यासारखे झाले. स्वतः लालूप्रसाद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत त्यामुळेच त्यांना निवडणूक लढवायला बंदी आहे. बाकीचे कुटुंबही त्याच दिशेने प्रवास करत असल्यासारखे दिसू लागले आणि या साऱ्याचे समर्थन करताना नितीश बाबूंच्या नाकी नऊ आले. राष्ट्रीय जनता दल हे आता नितीशबाबूंचे अवघड जागेचे दुखणे होऊन बसले.
                    पण नितीशकुमारांच्या राजीनाम्यामागे एवढेच कारण आहे असे निदान मलातरी वाटत नाही. याच वर्षीच्या मे महिन्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला ३ वर्षे पूर्ण झाली. देशातील विविध वृत्तवाहिन्यांनी या निमित्ताने जनमत चाचण्या घेतल्या आणि सरसकट सगळ्याच चाचण्यांमध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता टिकून असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारची स्वच्छ प्रतिमा, नोटबंदी आणि सर्जिकल स्ट्राईक सारखे निर्णय व जनधन,उज्वला, पीक विमा इत्यादी योजनांमधून जनमानसात सरकारविषयी सकारात्मक भावना असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यातच उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात निवडणूक झाली आणि भाजपने अभूतपूर्व यश संपादन केले. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या घडीला निवडणूक झाल्या तर भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला २०१४ सालापेक्षाही मोठे यश मिळेल असे भाकीत या वृत्तवाहिन्यांवरील समीक्षकांनी केले. आता अशा परिस्थितीमध्ये अनेक पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी धडपडले तर त्यात नवल ते काय? जे पक्ष भाजपसोबत येऊ शकत नाहीत अशा पक्षातील अनेक नेतेमंडळी भाजपच्या वाटेवर असतीलही. आणि जशी २०१९ ची लोकसभा निवडणूक जवळ येईल तशी अशा प्रकारच्या बातम्यांची संख्या वाढणार हे नक्की.
                   
बिहारमध्ये महागठबंधन चा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर देशभरात अशा प्रकारचा प्रयोग २०१९ मध्ये करावा आणि नितीशकुमारांनी त्याचे नेतृत्व करावे असे अनेक मोदीविरोधकांना वाटत होते. पण बिहारमध्ये लालूंनी आणि काँग्रेसने नितीशना नेतृत्व करू दिले कारण लालूंवर स्वतःवर निवडणूक लढवायला बंदी आहे आणि काँग्रेसचे बिहारमधील अस्तित्व मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याइतके नाही. पण देशपातळीवर परिस्तिथी वेगळी आहे. काँग्रेस हा कितीही कमजोर असला तरी एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि गांधी परिवारातील सदस्यांनी इतर कोणाच्यातरी नेतृत्वाखाली काम करावे या विचारला काँग्रेसमध्ये कोणीही होकार देणार नाही. बंगालमधील ममतादीदीसुद्धा अशा प्रयोगात कितपत साथ देतील हे ब्रह्मदेवही आज सांगू शकत नाही. तसे पहिले तर २०१९ च्या निवडणुकीची रणधुमाळी २०१८ च्या दिवाळीपासूनच सुरु होईल. अशा परिस्थितीमध्ये विरोधी ऐक्याविषयी काहीही प्रगती होत नाही आणि नजीकच्या काळात ती होण्याचे लक्षणही दिसत नाही. त्यामुळे यांच्या भरवशावर राहणे नितीशकुमारांना धोक्याचे वाटले असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको. सध्याच्या विरोधी पक्षाच्या एकत्रीकरणात अडथळा येण्याची कारणमीमांसा करताना एक संस्कृत श्लोक चपखल बसतो.

यत्र सर्वे नेतार: सर्वे पण्डितमानिन:।
सर्वे महत्वमिच्छन्ति तत्र कार्यं विनश्यति ।।
(अर्थ: जिथे सगळेच स्वतःला नेता समजतात, प्रत्येकाला आपणच हुशार असे वाटते आणि प्रत्येकाला महत्व पाहिजे असते, असे काम बिघडते.)

                     नितीशकुमारांनी कट्टर मोदीविरोध करून पाहिला. पंतप्रधानपदावर डोळा ठेवताना हातचे मुख्यमंत्रीपदही जाते की काय अशी वेळ आली. त्यातून सावरण्यासाठी लालू आणि काँग्रेसचा हात हाती घ्यावा लागला आणि आपण आपल्या गळ्यात काय बांधून घेतले याची जाणीवही त्यांना काळानुरूप झाली. गेल्या तीन वर्षात काही ठराविक अपवाद वगळता अमित शहांच्या नेतृत्वाखाली भाजपने अत्र तत्र सर्वत्र यश मिळवले. त्यामुळे मोदींना विरोध करत हातचे गमावण्यापेक्षा सलोखा करून मिळेल तेवढे पदरात पाडून घ्यावे असा सारासार विचार नितीशबाबूंनी केला. त्यामुळे नितीशकुमारांनी चाचपणी सुरु केली. नोटबंदीवरून इतर विरोधी पक्ष सरकारवर टीका करत असताना नितीशनी नोटबंदीचे स्वागत केले. त्यानंतरही अनेक प्रसंगी केंद्र सरकारशी जवळीक करून लालू आणि काँग्रेसला चिडवले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन खुला इशारा केला. आणि अखेरीस लालूपुत्राच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महागठबंधनाची इतिश्री केली.
                     लालू आणि काँग्रेसने नितीशकुमारांवर संधिसाधूपणाचा आरोप केला. पण राजकारणात हे काही प्रथमच झाले नाही आणि आरोप करणाऱ्यांनीही असे डावपेच आजवर अनेकदा केले आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणतात की नितीश भाजपसोबत जातील असे गेल्या ३-४ दिसत होते. हे जर खरे असेल तर नितीशकुमारांसारख्या नेत्याला भाजपच्या गोटात जाण्यापासून परावृत्त करून विरोधी आघाडी बळकट करण्याकडे राहुल गांधींनी लक्ष का दिले नाही हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. अशा विस्कळीत आणि बेसावध विरोधकांमुळेच नितीशकुमारांचा विरस झाला असावा.
                     या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपशी हातमिळवणी करून नितीशकुमारांनी लालूप्रसादांपासून आपली सुटका करून घेतली आणि पुढील काळातील आपल्या यशाची बेगमी करून ठेवली असेच म्हणावे लागेल. 

Thursday, June 29, 2017

लोकप्रतिनिधी कि मालक?


शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार श्री रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याचे वृत्त सध्या चर्चेमध्ये गाजते आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानात बसण्याच्या जागेवरुन वाद झाला. त्यानंतर एअर इंडियाचा कर्मचारी आणि गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. लोकप्रतिनिधी आणि त्यांचे असे किस्से हे काही नवीन नाही. यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक किस्से लोकांनी वेळोवेळी चर्चिले आहेत. कोणी आपलीच मनमानी करतो तर कोणी आपल्यासाठी ट्रेन अथवा विमानाच्या वेळा बदलतो. हे प्रकरणही त्याच मालिकेतील पुढचा भाग आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
रवींद्र गायकवाडांकडे याबद्दल वृत्तवाहिन्यांनी विचारणा केली असता आपण कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या या कृतीचे उद्दामपणे समर्थनच करताना ते दिसत आहेत. लोकप्रतिनिधी असलेल्यांना आवश्यक तेवढा मान सन्मान दिला जावा याबद्दल काहीच दुमत असणार नाही. काहीतरी कर्तृत्व असल्यानेच त्यांना लोकांनी निवडून दिले असावे. परंतु आपल्या पदाचा, समाजातील स्थानाचा आणि एकूणच अस्तित्वाचा इतरांना त्रास होणार नाही असे वर्तन राखणे हे अशा लोकप्रतिनिधींचे कर्तव्यही आहे. मात्र बहुतांश वेळा असे होताना दिसत नाही. देशाचा पंतप्रधान स्वतःला प्रधानसेवक म्हणवून घेत असताना खासदारापासून ते साध्या नगरसेवकांपर्यंत अनेकजण आपण स्वतः जनतेचे मालक असल्याच्या अविर्भावात हिंडताना दिसतात.
आपण लोकप्रतिनिधी आहोत म्हणजे केवळ आपण आपल्या मतदारसंघाचे प्रश्न लोकसभा-विधानसभेत मांडले की आपले काम झाले असे नाही. सार्वजनिक जीवनात काम करताना आपली वर्तणूक ही आपण ज्यांचे प्रतिनिधित्व करतो त्यांना अभिमान वाटेल अशीच ठेवली पाहिजे, कमीत कमी त्यांना लाज आणणारी असू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु हा मुद्दा अनेकदा दुर्लक्षित होतो. अर्थात, अत्यंत साधेपणाने राहणारे आणि सामान्य कार्यकर्त्यांशीही अतिशय अदबीने बोलणारे अनेक नेते होऊन गेले आणि आजही आहेत. त्यांच्याविषयी प्रसारमाध्यमेही काही सांगत नाहीत कारण अशा गोष्टींना TRP नसतो.
अर्थात हा मुद्दा केवळ सत्ता हाती असलेल्या राजकारण्यांपुरता मर्यादित नाहीये. विविध क्षेत्रात अधिकारपदावर असणाऱ्या अनेक लोकांमध्येही याची लागण झालेली आढळून येईल. अगदी गावच्या तलाठ्यापासून जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आणि नगरपालिकेतील जन्म-मृत्यू नोंदणी करणाऱ्या कारकुनापासून ते मंत्रालयातील सचिवांपर्यंत अनेकजण आपल्या अधिकाराच्या गुर्मीत वावरताना दिसतील. समाजाच्या याच घटकांचे प्रतिनिधित्व केल्यामुळे आपले आमदार-खासदार असे वागतात की लोकप्रतिनिधी असे असल्याने खालचे लोक त्यांचे अनुकरण करतात हा प्रश्न म्हणजे कोंबडी आधी की अंडे आधी याच्याइतकाच कठीण आहे.
असं म्हणतात की दैनंदिन वर्तणुकीवरून एखाद्याच्या स्वभावाची,वृत्तीची आणि चारित्र्याची परीक्षा केली जाते. अजून थोडी कठीण परीक्षा करायची असेल तर हलाखीची परिस्तिथी आली तर माणूस कसा वागतो त्यावरून करता येते. अर्थात हलाखीच्या परिस्थितीमध्येही धैर्य, संयम आणि चांगुलपणा धरून ठेवणारे अनेकजण मिळतात. पण जर एखाद्याच्या वृत्तीची खरी परीक्षा पाहायची असेल तर त्याच्या हाती अधिकार आणि सत्ता असताना केलेल्या त्याची वागणूक कशी आहे यावरून पाहता येईल. दुर्दैवाने अधिकार आणि सत्ता हाती आल्यावर अनेकांची मदांध आणि दुराग्रही बाजूच पुढे येताना दिसते. 
रवींद्र गायकवाडांच्या प्रकरणात काय सत्य आहे ते कालांतराने उघड होईलच. सर्व भारतीय विमान कंपन्यांनी एकत्रितपणे त्यांच्यावर बहिष्कार घातला असून त्यांची परतीची तिकिटे रद्द केली आहेत. सरकारही काही कायदेशीर कारवाई करता येईल का याविषयी आढावा घेत आहे आणि शिवसेना नेतृत्वानेही आपल्या खासदाराच्या वागणुकीची दाखल घेत त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी बोलावले आहे. अर्थात लोकशाहीमध्ये अशा लोकांचा उन्माद उतरवण्याची संधी जनतेकडे आहे आणि वेळोवेळी जनतेने त्याचा वापरही केला आहे. फळांनी लगडलेला वृक्ष जसा झुकतो तसेच सत्तेच्या अधिकारपदावर असणारे लोक त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव होऊन विनम्रपणे वागतील तोच सुदिन.
(सदर लेख marathi.rightlog.in वर मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झालेला आहे)

मणिपूर व गोवा: कोण जिंकले कोण हरले?


११ मार्च रोजी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे सूप वाजले. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जनतेने भारतीय जनता पक्षाला छप्परतोड बहुमत दिले तर पंजाबने अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला कौल देत नवसंजीवनी दिली. गोवा आणि मणिपूर या दोन छोट्या राज्यांमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि सत्तेची चावी लहान पक्ष आणि अपक्षांच्या हाती गेली. त्यामुळे ज्याला बेरजेचे गणित साधेल त्यालाच सत्ता मिळेल हे ओघाने आलेच. या दोन्ही राज्यात सर्वात मोठा पक्ष बनलेल्या काँग्रेसला सत्तेपर्यंत पोचता आले नाही आणि “दैव देतं आणि कर्म नेतं” याचाच प्रत्यय काँग्रेसजनांना आला.
गोव्याच्या एकूण ४० जागांपैकी काँग्रेसला १७ तर भारतीय जनता पक्षाला (भाजपा) १३ जागी विजय मिळाला. बाकीच्या १० जागांवर लहान पक्ष आणि अपक्षांनी बाजी मारली. वास्तविक पाहता या राज्यात भाजपाची सत्ता होती. त्यामुळे मिळालेला कौल हा भाजपा सरकारवरील नाराजी प्रकट करणारा होता असे प्रथमदर्शनी निदान करणे फारसे चुकीचे नाही. याचाच फायदा घेऊन लहान पक्षांची मोट बांधून सरकार स्थापन करणे काँग्रेसला फारसे कठीण नव्हते. पण प्रत्यक्षात मात्र झाले उलटेच. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी १३ सदस्य असलेल्या भाजपाला प्रत्येकी ३ सदस्य असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टीने पाठिंबा दिला. तसेच २ अपक्षांच्या मदतीने भाजपने २१ चा जादुई आकडा गाठत सरकार स्थापनेचा दावा केला. मनोहर पर्रीकरांनी केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा देत १४ मार्च रोजी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीसुद्धा. अर्थात त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसने केला पण न्यायालयाचा निकाल आपल्याला अनुकूल लागणार नाही हे काँग्रेसला आधीच ठाऊक असावे.
१७ सदस्य हाताशी असतानाही सरकार स्थापनेचा दावा काँग्रेस का करू शकले नाही याची तीन मुख्य करणे आहेत. या तीन गोष्टींमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये तुलना केली की हि कारणे ठळकपणे उठून दिसतील. 
पहिले कारण म्हणजे नेतृत्वाविषयीची एकवाक्यता. काँग्रेसच्या निवडून आलेल्या १७ सदस्यांपैकी ५ जण माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपणच कसे मुख्यमंत्री होऊ याचीच चिंता होती. तसेच जर आपण मुख्यमंत्री होत नसू तर आपला कट्टर प्रतिस्पर्धीही मुख्यमंत्री हाऊ नये यासाठीच प्रयत्न झाले. भाजपा आणि नव्या मित्रांमध्ये मनोहर पर्रीकरांच्या नावाविषयी काहीच दुमत नव्हते. किंबहुना पर्रीकर मुख्यमंत्री होणार असतील तरच पाठिंबा देऊ असा मगोपा आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचा आग्रह होता.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील प्रभारी नेत्यांच्या कामाचा वेग. काँग्रेसचे प्रभारी दिग्विजय सिंग आणि भाजपचे प्रभारी नितीन गडकरी यांच्या कामाच्या शैली भिन्न आहेत. दरबारी पद्धतीची सवय असलेल्या दिग्विजय सिंगांनी संथ कारभार केला आणि केवळ ४ सदस्यांची जमवाजमव करण्यामध्येही त्यांना यश आले नाही. याच्या बरोब्बर विरुद्ध नितीन गडकरींनी रात्रभर विविध पक्षांशी आणि अपक्षांशी चर्चा करून निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी २१ चा जादुई आकडा गाठण्यात बाजी मारली.
तिसरा आणि अतिशय महत्वाचा फरक म्हणजे केंद्रीय नेतृत्वाची भूमिका. काँग्रेसची अवस्था “राजा बोले दळ हाले” अशी आहे. हाय कमांडकडून मंजुरी अथवा आदेश मिळाल्याशिवाय काँग्रेस नेत्यांचे पान हलत नाही. त्यामुळे दिग्विजय सिंगांनाही वरून आदेश येईपर्यंत काहीही निर्णय करणें शक्य झाले नाही. याउलट नितीन गडकरींनी गोव्यातील परिस्थिती नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या कानी घातली आणि भाजपा नेतृत्वाने “तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या” असे स्वातंत्र्य नितीन गडकरींना दिले. केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या अधिकारांचा वापर करत गडकरींनी अपक्ष आणि छोट्या पक्षांशी वाटाघाटी करून निर्णय घेतले आणि मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन करण्याचा दावा केला.
मणिपूरमध्ये ६० पैकी २८ जागी काँग्रेसला यश मिळाले तर २१ जागी भाजपने विजय मिळवला. बाकीच्या जागा छोटे पक्ष आणि अपक्षांनी जिंकल्या. मात्र इथे १५ वर्षांपासून काँग्रेसचे श्री. इबोबी सिंग मुख्यमंत्रीपदी आरूढ असल्याने काँग्रेसला गोव्याप्रमाणे नैतिकदृष्ट्या अनुकूलता नव्हती. हा निकाल काँग्रेसच्या सरकारविरोधातील जनादेश होता. तरीही केवळ ३ जागांची जुळवाजुळव करून सरकार स्थापन करणें सहज शक्य होते. परंतु इथेही काँग्रेसला ते साधता आले नाही.
४ सदस्य असणारा NPF (नागा पीपल्स फ्रंट) हा केंद्रातील भाजपा आघाडीमध्ये सामील आहे तसेच नागालँडमध्ये भाजपबरोबर सत्तेमध्ये विराजमान आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा भाजपाला मिळणार यात काहीच नवल नव्हते. NDA मधील अजून एक घटक पक्ष असलेल्या रामविलास पासवानांच्या लोकजनशक्ती पक्षाचा एक आमदारही भाजपच्याच बाजूने उभा राहिला. त्यामुळे भाजपच्या बाजूने २६ तर काँग्रेसच्या बाजूने २८ आमदार होते. परंतु भाजपने तृणमूल काँग्रेसच्या एका आणि नॅशनल पीपल्स पार्टीच्या (NPP) ४ सदस्यांना गळाला लावत ३१ चा बहुमताचा आकडा पार केला. एव्हढेच नव्हे तर भाजपाच्या पत्रकार परिषदेत नव्याने निवडून आलेला काँग्रेसचाही एक आमदार उपस्थित झाला आणि त्याने भाजपाला पाठिंबा दिला.
अर्थात काँग्रेसच्या या आमदाराला पक्षांतरबंदी कायद्यानुसार राजीनामा द्यावा लागेल. तसे झाल्यास काँग्रेसचे बळ २७ वर येईल आणि बहुमताचा आकडा ३१ वरून ३० होईल. काँग्रेसचे अजून ६ आमदार भाजपाला येऊन मिळणार असल्याची वदंतादेखील आहे. मणिपूरमधील बेरजेचे गणित जमवून आणण्यामागे पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि आताचे भाजपा नेते हेमंत बिस्वा शर्मा यांचा मोठा हात आहे. गोवा आणि मणिपूर ही दोन्ही हातात आलेली राज्ये काँग्रेसने केवळ आपल्या कार्यशैलीमुळेच गमावली आहेत. त्यामुळे गोवा असो वा मणिपूर, काँग्रेसची अवस्था “हाथ आया पर मुह न लगा” अशीच झाली आहे.
(सदर लेख marathi.rightlog.in वर मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झालेला आहे)

भाषणस्वातंत्र्य: आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट


१६ फेब्रुवारी रोजी जामिया मिलिया विद्यापीठात ट्रिपल तलाक या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केले गेले होते आणि भाजप नेत्या शाझिया इल्मी यांना या चर्चासत्रामध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. शाझिया इल्मी या जामिया मिलिया विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनीदेखील आहेत. अचानकपणे या कार्यक्रमाचा दिवस बदलून २८ फेब्रुवारी करण्यात आला आणि कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वक्तासूचीमध्येही बदल करण्यात आला. नव्या सूचीमध्ये शाझिया इल्मी यांचे नाव वगळण्यात आले. एवढेच नव्हे तर चर्चासत्राचा पूर्वनियोजित विषय “ट्रिपल तलाक” हाही बदलून त्याऐवजी “मुस्लिम महिलांचे सक्षमीकरण” असा नवा विषय जाहीर केला गेला.
ANI या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाझिया इल्मी यांनी सांगितले की “ट्रिपल तलाक या मुद्द्यावर आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी मला आमंत्रित केले होते. ट्रिपल तलाक हा अतिशय महत्वपूर्ण मुद्दा आहे, परंतु आयोजकांवर दबाव आणण्यात आला. जर शाझियाला बोलू दिले तर विद्यापीठाच्या आवारात दंगलसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकेल असे त्यांना वाटले असावे.”
कन्हैयापासून उमर खालिदपर्यंत आणि अगदी संजय लीला भन्साळीपासून गुरमेहर कौरपर्यंत सगळ्यांच्या भाषणस्वातंत्र्याच्या संरक्षणाचा मक्ता घेतलेल्या प्रसारमाध्यमांना शाझिया इल्मी यांच्या भाषणस्वातंत्र्याविषयी अजिबात कळवळा वाटत नाही. त्यामुळे आपल्याला सोयीचे असेल त्याच विषयांवर भाषणस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्याची टिमकी वाजवायची हेच प्रसारमाध्यमांचे धोरण आहे असेच दिसून येते. म्हणूनच “भारत तेरे टुकडे होंगे” हे भाषणस्वातंत्र्याच्या संकल्पनेमध्ये एकदम फिट्ट बसते तर अशा घोषणांच्या विरोध करणे म्हणजे स्वातंत्र्याची मुस्कटदाबी असल्याचे मानले जाते.
अशा स्वरूपाचा भेदभाव होण्यामागे बेगडी धर्मनिरपेक्षता हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे शनिमंदिर आणि तिरुपती मंदिरातील प्रथांविषयी चर्चासत्रे घडवून आणणाऱ्या प्रसारमाध्यमांना अल्पसंख्य समाजातील चुकीच्या गोष्टींवर चर्चा करायला वेळ नसतो. अशा विषयांवर भाष्य करू पाहणारा प्रत्येक आवाज कसा दाबला जाईल याकडेच लक्ष दिले जाते. ट्रिपल तलाक हाही महिलांच्या सन्मानाविषयीचा प्रश्न आहे. परंतु याविषयी चर्चा केली तर ती मुस्लिम धर्मामध्ये लुडबुड मानली जाते आणि अशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार्यांना मुस्लिमविरोधी ठरवले जाते. त्याचमुळे शनिमंदिरात महिलांना नाकारलेला प्रवेश आणि ट्रिपल तलाक या दोन्ही गोष्टी जरी स्त्रियांच्या हक्काविषयी असल्या तरी एकाच तराजूमध्ये तोलल्या जात नाहीत.
मध्यंतरी पद्मावती या येऊ घातलेल्या चित्रपटात राजपूत इतिहासाचे विडंबन केले गेल्याचा आरोप करत एका गटाकडून संजय लीला भन्साळी यांना मारहाण झाली. तेव्हा बॉलीवूड आणि प्रसारमाध्यमांनी भन्साळींच्या स्वातंत्र्यावर गदा आल्याचा ढोल वाजवण्यात काहीही कसर शिल्लक ठेवली नाही .परंतु पैगंबरावरील एका चित्रपटाला संगीत दिल्याबद्दल ए आर रहमान यांच्याविरुद्ध फतवा काढण्यात आला तेव्हा यातील एकही महाभाग रहमानच्या व्यक्तीस्वातंत्र्याची काळजी करताना पुढे आला नाही. सिनेमॅटिक लिबर्टीचे समर्थन करायचे असेल तर ते प्रत्येक विषयाला ते सारखेच लागू असले पाहिजे. 
प्रसारमाध्यमांमधील सारेच लोक या विचारांचे आहेत असा दावा आम्हाला अजिबात करायचा नाही. बहुतांशी पत्रकार तटस्थपणे काम करतही असतात. पण एका ठराविक विचारांचे एवढे वर्चस्व प्रसारमाध्यमांमध्ये प्रस्थापित झाले आहे कि अनेकदा अशा तटस्थ पत्रकारांनाही दुसरा काही पर्याय उरत नाही. स्वातंत्र्यानंतर बराच काळ देशावर काँग्रेसची सत्ता राहिली आहे. अनेक शैक्षणिक संस्था आणि प्रसारमाध्यमे यांमध्ये काँग्रेसने आपल्या सोयीचे लोक घुसवले आणि सध्याचा दुटप्पीपणा हा त्याचाच परिपाक आहे. 
मुद्दा केवळ शाझिया इल्मी यांना बोलू दिले अथवा नाही एवढ्यापुरता मर्यादित नाही. प्रत्येक स्वातंत्र्याला काही मर्यादा असतातच. परंतु एकाचे स्वातंत्र्य बेलगाम आणि इतरांच्या स्वातंत्र्याला मर्यादा हा खेळ चुकीचा आहे. सोशल मीडियाच्या उदयानंतर गोष्टी लपवायचा म्हटल्या तरी लपून राहत नाहीत. त्यामुळे वक्तिस्वातंत्र्याच्या दुकानदारांना या वास्तवाशी जितक्या लवकर जुळवून घेता येईल तेवढे चांगले आहे. नाहीतर अशी दुकाने देशातील जागरूक जनता लवकरच बंद करेल.
(सदर लेख marathi.rightlog.in वर मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झालेला आहे)

उत्तर प्रदेश निवडणूक आणि मुस्लिम मतांचे गूढ


उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये तीन दिवस तळ ठोकला आणि दोन रोड शो केले. या रोड शो दरम्यान मोदींना समर्थकांचा प्रचंड प्रतिसाद तर लाभलाच, परंतु मुस्लिम समुदायाकडून मिळालेला प्रतिसाद हे यावेळचे ठळक वैशिष्ट्य होते. मोदींचा ताफा मुस्लिमबहुल भागातून जात असताना मुस्लिम बांधवांनी त्यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत केले. एकेकाळी मुस्लिम समाजाचा कट्टर वैरी अशी प्रतिमा असलेल्या मोदींना मिळालेल्या या सौहार्दयाचे अनेकजण अनेक अर्थ काढत आहेत.
देशाचा पंतप्रधान आपल्या भागातून प्रचार फेरी काढत असेल तर त्यांच्या पदाचा मान राखण्यासाठी तोंडदेखले स्वागत केले गेले आणि यापेक्षा अधिक काही अर्थ काढू नये असा एक मतप्रवाह आहे. अर्थात असे मानणे अगदीच चुकीचे नाही कारण एखाद्या समुदायाच्या मनात असलेली अढी एवढ्या सहजासहजी पुसली जाईल असा विचार करणे एक तर भाबडेपणाचे आहे अथवा मूर्खपणाचे. परंतु मोदींना मुस्लिम समाजाने अजूनही आपला शत्रूच मानले आहे असे चित्र रंगवले जाते तेही चित्र तितकेसे खरे नाही हेच यातून सिद्ध होते.

गुजरात दंग्याच्या पार्श्वभूमीवर मोदींची मुस्लिमविरोधी अशी प्रतिमा तयार करण्यात त्यांच्या राजकीय विरोधकांना आणि प्रसारमाध्यमांना मोठ्या प्रमाणात यश आले. त्यामुळे जिथे दंगे झाले त्या गुजरातमधील मुस्लिम समुदाय मोदींना काही प्रमाणात स्वीकारत असतानाही गुजरातबाहेरील मुस्लिमसमुदाय मोदींविषयी तिरस्काराच्या भावनेतूनच पाहात होता.

मोदी पंतप्रधान झाले तर अल्पसंख्यांक समाजाचे आणि त्यातही मुसलमानांचे जगणे कठीण होऊन बसेल असा प्रचार लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळीही मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आता मोदी पंतप्रधान होऊन तीन वर्षे होत असताना विरोधकांनी आणि प्रसारमाध्यमांनी उभा केलेला बागुलबुवा किती खोटा होता हे मुस्लिम समाजाला हळूहळू जाणवू लागले आहे. त्यामुळेच मोदींविषयी भीती बाळगणाऱ्यांनाही मोदींविषयीचे आपले मत पुन्हा तपासून पाहायला भाग पडते आहे.
सत्तेवर आल्यापासून मोदींनी “सबका साथ सबका विकास” असा नारा दिला आणि त्याबरहुकूम कामही सुरु केले. कोणाचेही लांगुलचालन नाही तसेच कोणाविषयी आकसही नाही असा साधा सोप्पा आणि सरळ मार्ग त्यांनी पत्करला. केंद्र सरकारच्या योजना आता एका विशेष समुदायाला समोर ठेऊन आखल्या जात नाहीत आणि त्या त्या योजनांचा लाभ प्रत्येक समाजातील घटकांना मिळतो आहे हे साऱ्यांनाच समोर दिसते आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजना आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहेत आणि याचा लाभ मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे. कारण काँग्रेस आणि इतर तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांच्या कृपेने मुस्लिमसमुदाय बहुसंख्येने दुर्बल राहिला आहे. आजवर केवळ संघ, भाजप, मोदी आणि इतर उजव्या विचारसरणीच्या लोकांची भीती दाखवून या पक्षांनी मुस्लिम समाजाचा केवळ मतांसाठी उपयोग करून घेतला आहे.
भाजपने या निवडणुकीमध्ये ट्रिपल तलाकचा मुद्दा उपस्थित केला आहे. गेली काही वर्षे अनेक सामाजिक संघटनांनी हा मुद्दा प्रकाशात आणला परंतु तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी या मुद्द्याला केराची टोपली दाखविली आहे. भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा उपस्थित करून ५०% मस्लिम लोकसंख्येला साद घातली आहे. मुस्लिम समाजातील स्त्रियांची परिस्थिती या विषयावर चर्चा करणारे लोकही अनेकदा ट्रिपल तलाकच्या मुद्द्याला हात लावताना कचरतात. अशा वेळी भारतीय जनता पक्षाने आपली मांडलेली बाजू अनेक मुस्लिम महिलांना योग्य वाटू शकते. अर्थात मोदींच्या प्रचार फेरीचे स्वागत केले याचा अर्थ आता मुस्लिम समाज मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाला मतदान करेल असे मानायचे काहीही कारण नाही. परंतु मोदींना घाबरण्याची काहीही गरज नाही असा विश्वास मुस्लिम समाजामध्ये निर्माण होताना दिसतो आहे.
मोदींच्या प्रचार फेरीमधील मुस्लिमसमाजाच्या सहभागाविषयी ज्याला जे समजायचे ते समजू दे. पण “मोदी म्हणजे खलनायक” हा समज पुसला जाऊन मोदी म्हणजे केवळ हिंदूंचाच नव्हे तर आपलाही पंतप्रधान आहे ही भावना मुस्लिम समुदायात रुजू लागली असेल तर देशासाठी ही आनंदवार्ताच आहे. तसेच अनेक दशके मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात न आणता केवळ बहुसंख्य समाजाची भीती दाखवून त्यांची मते मिळवण्याचे राजकारण करणाऱ्यांना हि एक सणसणीत चपराकही आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये काय होईल हे ११ मार्च ला स्पष्ट होईलच, पण देशातील अल्पसंख्य समाज जर मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असेल तर भारताच्या सामाजिक ऐक्यासाठी एक शुभसंकेतच मानावा लागेल.
(सदर लेख marathi.rightlog.in वर मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झालेला आहे)

गुरमेहर कौर: नवा गडी नवं राज्य


दिल्ली विद्यापीठाच्या रामजास महाविद्यालयात बुधवारी (ता. 22) उमर खालीद याच्या भाषणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. यादरम्यान अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या “ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन’च्या (AISA) कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केला तर असे देशविरोधी कार्यक्रम JNU मध्ये होत असले तरी दिल्ली विश्वविद्यालयात होऊ देणार नाही अशी भूमिका अभाविप ने घेतली आहे.
या संघर्षानंतर गुरमेहर कौर या लेडी श्रीराम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने “दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. ‘अभाविप’ला मी घाबरत नाही. मी एकटी नाही तर देशातील प्रत्येक विद्यार्थी माझ्याबरोबर आहे,” अशा मजकुराचा फलक हातात धरलेले छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले आहे. “स्टुडंट्‌स अगेन्स्ट एबीव्हीपी’ या शीर्षकाखाली तिने सोशल मीडियावर प्रचार मोहीम सुरू केली आहे. तिच्या या ट्विटनंतर इंटरनेटवर तिच्या समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. हा प्रकार विषय लक्षवेधक होत असल्याचे दिसताच वृत्तवाहिन्या लगेच तुटून पडल्या आणि गुरमेहर कौर अचानकपणे प्रसिद्धीस आली.
तसे पाहता डावी विचारसरणी आणि राष्ट्रवादी संघटना यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विचारांच्या विद्यार्थी परिषदेला विरोध करणे हा डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांचा सैद्धांतिक कार्यक्रम आहे. परंतु असे करताना अशा संघटनांनी अनेकदा देशविरोधी भूमिका घेतल्याचे आपण पहिले आहे. बिहार निवडणुकांच्या सुमारास कन्हैयाकुमार नावाचा असाच एक प्रकार आपण अनुभवाला आहे. त्यामुळे गुरमेहर कौर हिचा बोलविता धनी कोण आहे हे समजायला फार कष्ट पडू नयेत. गुरमेहर कौर प्रकरण म्हणजे कन्हैयाकुमार प्रकरणाचाच पुढचा अध्याय आहे.
अशा प्रकरणात अनेकदा हेच दिसून आले आहे की डावे पक्ष आणि देशभरातील प्रमुख प्रसारमाध्यमे अश्शाच लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात. कन्हैयाप्रमाणेच आता ही प्रसारमाध्यमे गुरमेहरला बोलवून चर्चासत्रे करतील. डाव्या पक्षाचे प्रेक्षक बोलवून आणि गुरमेहरच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या वसूल करून जनतेचा तिला किती पाठिंबा आहे हेही दाखवायचा प्रयत्न केला जाईल. तिच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला असहिष्णू म्हणून घोषितही केले जाईल. ती एका युद्धात बलिदान केलेल्या सैनिकांची मुलगी असल्याने त्याला एक सहानुभूतीचा पदरही आहे. तिच्या विरुद्ध बोलणे म्हणजेच तिच्या वडिलांच्या हौतात्म्याचा अपमान आहे असेही सिद्ध करायचा उपदव्याप काही महाभाग करताना दिसतील.
प्रसारमाध्यमांना आपापली चॅनेल्स २४ तास चालवायची असतात आणि देशातील वृत्तवाहिन्यांमधील स्पर्धा लक्षात घेता प्रत्येकालाच आपापल्या TRP ची चिंता करायची आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांना काही काळासाठी कोणीतरी एक नवा गणपती बसवावाच लागतो. असा गणपती बसवायचा, एक दोन आठवडे त्याच्याबद्दल चर्चेची गुऱ्हाळ चालवायची आणि नवा गणपती सापडला कि जुना विसर्जित करायचा हा वृत्तवाहिन्यांचा आवडता खेळ आहे. गेल्या दोन वर्षात हार्दिक पटेल, अखलाख, रोहित वेम्मूला, अवॉर्ड वापसी गॅंग, कन्हैयाकुमार, उमर खालिद, अंजली दमानिया असे कितीतरी गणपती बसवले गेले आणि भाव उतरल्यावर विसर्जितही केले गेले. गुरमेहर कौर हा त्याच मालिकेतील एक नवा गणपती आहे.
केवळ प्रसारमाध्यमेच नव्हे तर अनेक राजकीय नेत्यांनाही आता कंठ फुटेल. १५ दिवस निसर्गोपचार किंवा तत्सम काही उपचार घेऊन ताजेतवाने झालेले अखिल विश्वाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अशी संधी सहजासहजी जाऊ देणार नाहीत. काँग्रेसचे युवराज सध्या उत्तर प्रदेशच्या निवडणूक हरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना सवड मिळाली की तेही यात उडी घेतील. अर्थात ते या प्रकरणात लक्ष घालण्याआधी त्यांच्या वतीने हे काम करण्यासाठी अनेक लोक तयार असतील हेही खरेच आहे.नोटबंदीनंतर थयथयाट करणाऱ्या दीदी, या प्रकरणाचा फायदा-तोटा विचारात घेऊन काही बोलायचं अथवा गप्प बसायचा विचार करतील. भाजपातील वाचाळवीरांपैकीही कोणी अजून पुढे आलेले नाही. मागील चुकांवरून काही शिकले असावेत अशी अपेक्षा आहे.
गुरमेहर कौर ही हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांची मुलगी आहे म्हणून तिच्याबद्दल सहानुभूती असणे काही चुकीचे नाही. पण या एकाच कारणास्तव तिच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता दिली जाऊ शकत नाही. “PAKISTAN DID NOT KILL MY DAD. WAR KILLED HIM” असे ट्विट करण्यापूर्वी तिच्या वडिलांच्या बलिदानाचा विचार तिने करायला हवा होता. तिचे हे विधान हा एक तद्दन मूर्खपणा आहे. सध्या हा विषय सध्या ताजा आहे. त्यामुळे त्याभोवती चर्चासत्रे आयोजित करणे आणि विविध स्तरांतून प्रतिक्रियांचा बाजार मांडणे याला चांगला भाव आहे. अजून काही दिवसांनी या प्रकरणातही अन्य काही गोष्टी समोर येतील आणि गुरमेहरचा विषय चालू ठेवणे TRP च्या दृष्टीने फायदेशीर राहणार नाही. तेव्हा प्रसारमाध्यमे आणि राजकीय नेते हा विषय गुंडाळून ठेवतील आणि नव्या संधीची वाट पाहत बसतील.
काल कन्हैयाकुमार झाला, आज गुरमेहर आहे, उद्या कोण असेल हे आम्ही आजच कसे सांगणार? पण प्रत्येक वेळी अशा खेळांना लोक बळी पडतीलच अशा भ्रमात कोणी राहू नये.
(सदर लेख marathi.rightlog.in वर फेब्रुवारी २०१७ मध्ये प्रकाशित झालेला आहे)

सुब्रमनियन स्वामींची गुगली आणि शशिकला आउट


सुब्रमनियन स्वामी हे एक गूढ अनाकलनीय व्यक्तिमत्व आहे आणि सध्या तामिळनाडूमध्ये चाललेल्या सत्तानाट्याला बऱ्याच अंशी तेच कारणीभूत आहेत.
१९९१ ते १९९६ या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याचा (Disproportionate Assets) आरोप करीत सुब्रमनियन स्वामींनी जयललितांवर गुन्हेगारी स्वरूपाचा खटला भरला. १८ वर्षे चाललेल्या या खटल्याचा निकाल सप्टेंबर २०१४ मध्ये लागला तेव्हा जयललिता तिसऱ्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या होत्या. जयललिता, त्यांची मैत्रीण शशिकला आणि इतर ३ जणांना न्यायालयाने दोषी ठरविले. जयललितांना १०० कोटी रुपये दंड आणि ४ वर्षे कैदेची शिक्षा झाली तर इतर चौघांना प्रत्येकी १० कोटी रुपये दंड आणि ४ वर्षे कैदेची शिक्षा सुनावली गेली. याचा परिपाक म्हणून जयललितांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले आणि त्यांनी ओ पन्नीरसेल्वम यांना रबरस्टॅम्प मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. पन्नीरसेल्वम मुख्यमंत्री असले तरी सगळा कारभार अम्माच चालवणार हे गृहीतच होते.
विशेष न्यायालयाच्या निकालाविरुद्ध जयललितांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अपील केले आणि मे २०१५ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने जयललिता आणि बाकीच्या चौघांनाही दोषमुक्त केले. पन्नीरसेल्वम यांनी आज्ञाधारकपणे मुख्यामंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि जयललिता पुन्हा एकदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या.न्यायालयाच्या याच निर्णयाचा फायदा घेत त्यांनी आपल्यासाठी सहानुभूतीची लाट तयार केली आणि याच लाटेवर स्वर होत २०१६ मध्ये तामिळनाडूची सत्ता पुन्हा एकदा काबीज केली.

सुब्रमनियन स्वामींनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याच दरम्यान सप्टेंबर २०१६ मध्ये जयललितांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागले आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वतःकडेच ठेवत आपल्या खात्यांचा कार्यभार ओ पन्नीरसेल्वम यांच्याकडे अधिकृतपणे दिला.

५ डिसेंबर २०१६ ला जयललिता यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्याच रात्री ओ पन्नीरसेल्वम यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. इथेच तामिळनाडूच्या राजकारणातील वाद चव्हाट्यावर यायची सुरुवात झाली.
शशिकला या जयललितांच्या खास मर्जीतील व्यक्तींपैकी एक होत्या. अम्मांच्या राजकारणावर शशिकलांचा पगडा होता. २०११ साली दगा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत जयललितांनी शशिकला यांना सहकुटुंब बाहेरचा रास्ता दाखवला होता. पुढे वर्षभरातच अम्मांची सपशेल माफी मागत शशिकलांनी पुन्हा एकदा पक्षात आणि जयललितांच्या घरात प्रवेश केला आणि आपले वर्चस्व पुनःप्रस्थापित केले. जयललितांच्या अखेरच्या काळात शशिकलांनी इतर कोणालाही अम्मांच्या संपर्कात येऊ दिले नाही आणि जयललिता आणि बाहेरील जग यांमध्ये एक भिंतच उभी केली. यातूनच अनेकांना त्यांच्याविषयी संशय वाटू लागला.
जयललितांच्या मृत्यनंतर पन्नीरसेल्वम मुख्यमंत्री झाले असले तरीही शशिकलांनी पक्षाच्या सरचिटणीसपदावर आपली वर्णी लावून आपणच पक्षाच्या सर्वेसर्वा असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. फेब्रुवारी २०१७ मध्ये सुब्रमनियन स्वामींनी सर्वोच्च्च न्यायालयात दाखल केलेल्या अपिलावर निकाल अपेक्षित असल्याने शशिकला अस्वस्थ झाल्या आणि त्यांना निकाल लागण्याआधी मुख्यमंत्री होण्याचे वेध लागले. त्यांनी पन्नीरसेल्वम याना तडकाफडकी राजीनामा देण्यास भाग पाडले. जयललितांचे विश्वासू असणाऱ्या पन्नीरसेल्वम यांना हे जिव्हारी लागले. अम्मांविषयी असणारा आदर त्यांच्या मैत्रिणीविषयी असण्याचे काहीच कारण नव्हते आणि म्हणूनच जयललितांच्या समाधीच्या साक्षीने पन्नीरसेल्वम यांनी बंड पुकारले.
हा डाव पूर्णपणे शशिकलांच्या ताब्यात होता आणि त्यांनी तो घाई करून घालवला असेच म्हणावे लागेल. पन्नीरसेल्वम हा काही फार मोठा जनाधार असलेला नेता नाही त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदी राहू दिले असते तरीही तुरुंगात गेल्यानंतरही आपल्याला हवा तसा कारभार शशिकला करू शकल्या असत्या. पण तेवढा आत्मविश्वास नसल्यानेच शशिकलांनी आततायी निर्णय घेतले आणि होत्याचे नव्हते केले. पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपद अम्माकृपेने मिळाले होते आणि शशिकलांनी ते काढून घेतले. आता पन्नीरसेल्वम यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नसल्याने त्यांना लढाईचे भय उरले नाही आणि ते उघडपणे मैदानात उतरले.
१४ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना दोषी मानून शिक्षा सुनावली. त्याचसोबत पुढील १० वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घातली. आता आपली राजकीय इनिंग सुरु होताच संपताना पाहून शशिकला यांनी लगोलग मोहरे हलवायला सुरुवात केली. ओ पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या १९ समर्थकांना पक्षातून बाहेर काढून पलानिस्वामी यांना विधानसभेचा पक्षनेता नियुक्त केले. आता पलानिस्वामी यांनी राज्यपालांची भेट घेत सरकारस्थापनेचा दावा केला आणि मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेतली.
एकाच वेळी अनेकजणांना शिंगावर घेणे ही सुब्रमनियन स्वामींची प्रवृत्ती आहे. जयललितांवरील खटला चालू असतानाच स्वामींनी 2-G, National Herald, अयोध्या राममंदिर खटला इत्यादी अनेक हाय प्रोफाइल खटले सुरु केले. जयललिता खटल्यात २० वर्षे परिश्रम करून दोषी असलेल्यांना शिक्षा झाल्यावर सुब्रमनियन स्वामी नक्कीच थांबणार नाहीत. निकालानंतर स्वामींनी केलेले ट्विट त्यांच्या पुढील लढाईबद्दल सूचना देत आहे.
@Swamy39: After 20 years I won. Now turn of TDK Buddhu PC BC & Tata to join in jail
अर्थात सोनिया गांधी, राहुल गांधी, पी चिदंबरम, कार्तिक चिदंबरम आणि रतन टाटा या मंडळींनी आपापले देव पाण्यात घालून बसायला हरकत नाही.
(सदर लेख marathi.rightlog.in वर फेब्रुवारी २०१७ मध्ये प्रकाशित झालेला आहे)

Wednesday, February 8, 2017

मुंबई का किंग कौन


          या महिन्याच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात जिल्हा परिषदा आणि दहा महानगरपालिकांचा समावेश आहे. निवडणुका दर पाच वर्षांनी होताच असतात पण यंदाची गोष्ट थोडी निराळी आहे. गेली कित्येक वर्षे या निवडणुका युती विरुद्ध आघाडी अशाच होत आल्या आहेत. अर्थात अनेक ठिकाणी छोटे पक्ष, अपक्ष आणि ठिकठिकाणच्या शहर/ग्राम विकास आघाड्या अशा निवडणुकांमध्ये सहभागी होतच होत्या, पण मुख्य लढत दोन प्रमुख गटांमध्येच होत आली आहे. या वर्षी विविध कारणास्तव प्रमुख पक्षांनी वेगवेगळे लढायचे ठरवल्याने आता या निवडणुका बहुरंगी आणि बहुढंगी होताना दिसत आहेत आणि हेच यंदाचे वेगळेपण आहे.
          या साऱ्या निवडणुकांमध्येही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक विशेष ठरणार आहे कारण याचे परिणाम केवळ महानगरपालिका जिंकणे/हरणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने गेली २५ वर्षे मुंबईत एकमेकांच्या साथीने निवडणुका लढवल्या आणि ठराविक कालखंड वगळता मुंबई महानगरपालिकेवर सत्ताही गाजवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना गेल्या काही वर्षात मुंबई महानगरपालिका निवडणुकीत लक्षणीय असे यश मिळाले नाही, परंतु शिवसेना आणि भाजप मधील भांडणाचा फायदा करून घेण्याइतकी ताकद तरी या पक्षांकडे शिल्लक आहे का याचे उत्तरही मिळून जाईल. मनसेला गेल्या निवडणुकीत चांगले यश मिळाले होते पण गेले दोन-तीन वर्षातील त्यांची वाटचाल पाहता हि त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असल्यासारखीच आहे. ओवेसींच्या MIM ने काही ठराविक भागात प्रभाव निर्माण केला आहे. पण कोण किती पाण्यात आहे हे समजायला २२ फेब्रुवारीची वाट पाहावी लागेल.
          मुंबई हे शिवसेनेचे जन्मस्थान आणि प्रभावक्षेत्र असल्याने या निवडणुकीचे महत्व शिवसेनेसाठी अधिक आहे. राज्यात शिवसेना भाजप युतीमध्ये शिवसेना प्रभावी राहिली. पण भाजपचा वाढता प्रभाव शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू लागला. याचे पर्यवसान विधानसभेची लढाई वेगवेगळी लढण्यात झाले आणि मुंबईत भाजपपेक्षा एक आमदार कमी निवडून आल्याचा घाव शिवसेनेला जिव्हारी लागला आहे. इतके दिवस आपल्या मर्जीप्रमाणे युती चालवणाऱ्या सेनेला आपली पूर्वीची पत पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मुंबई जिंकणे कळीचे होऊन बसले आहे. गुजराती मतांसाठी सेनेने हार्दिक पटेलला दत्तक घेतले असून त्याला या वर्षीच्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणूनही घोषित केले. अर्थात आमदार व्हायला २५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असताना २३ वर्षाचा हार्दिक मुख्यमंत्री कसा होणार हा प्रश्न वाघाला विचारणार कोण ही गोष्ट निराळी. मुंबई जिंकल्यास मुंबईचे अर्थकारण सेनेला नवसंजीवनी देऊ शकेल. त्याच जोरावर राज्य सरकारमध्ये आधी मंत्रीपदे अथवा "अर्थपूर्ण" खात्यांची मागणी शिवसेना करू शकेल आणि भाजप सरकारला शिवसेनेला अधिक महत्व द्यावे लागेल. परंतु जर शिवसेना स्वबळावर सत्तेवर येऊ शकली नाही आणि भाजपची मदत घ्यावी लागली तर सेनेला मोठा धक्का असेल.
          भारतीय जनता पक्ष एक राष्ट्रीय पक्ष असूनही अनेक वर्ष शिवसेनेचा लहान भाऊ असल्यासारखा होता. अर्थात "बाळासाहेबांच्या" शिवसेनेची ताकद आणि दरारा हे त्यामागील कारण होते. महाजन-मुंडे जोडीने शिवसेनेशी सलोखा ठेवला होता. पण नवे नेतृत्व पुढे येताच एका प्रादेशिक पक्षाची दादागिरी सहन करू नये असा मतप्रवाह भाजपमध्ये तयार झाला. विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवूनही मुंबईत सेनेपेक्षा एक जागा जास्त मिळाल्याने भाजपला हुरूप आला. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्येही युतीची घोषणा झाली पण बहुतांश ठिकाणी सारेच पक्ष स्वतंत्र लढले. या निवडणुकांच्या निकालांनी भाजपच्या शिडात अजून हवा भरलेली दिसते आहे. भाजपने मुंबई जिंकल्यास एक महत्वपूर्ण लढाई जिंकल्याचे आणि शिवसेनेची खोड मोडल्याचे समाधान त्यांना मिळेल. मुंबई हरल्यास प्रतिष्ठा कमी होऊन राज्य सरकार चालवताना सेनेशी जुळवून घ्यावे लागेल. पण मुंबई महापालिका जिंकणे/हरणे हा भाजपासाठी सेनेइतका कळीचा मुद्दा नाही.
          काँग्रेसची मुंबईतील संघटना सध्या वादाने ग्रासली आहे. संजय निरुपम आणि गुरुदास कामत या दोन नेत्यांमध्ये सुरु असलेल्या शीतयुद्धाचा फटका आधीच कमजोर असलेल्या मुंबई काँग्रेसला बसण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेतून काँग्रेसवासी झालेले आणि सध्या मुंबई काँग्रेसचे प्रमुख असलेले निरुपम आणि जुने काँग्रेसी कामत यांची कार्यशैली भिन्न असून त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरु आहे. नारायण राणे यांनीसुद्धा मुंबईत फारसे लक्ष न घातल्यास त्याचेही परिणाम काँग्रेसला भोगावे लागू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील ताकद इतर तीन पक्षांना लढत देण्याइतकी नक्कीच नाही याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही.
          राज ठाकरेंच्या मनसे ने गेल्या निवडणुकांध्ये २८ नगरसेवक निवडून आणत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र सध्या मनसेसमोर गेल्या २-३ वर्षात लागलेली गळती आणि इतर अनेक कारणांमुळे दुरावलेला मतदार असा विचित्र तिढा आहे. मुंबईत एकही आमदार निवडून न आल्याचे मनसेला चांगलेच झोंबले असेल. ओवेसींच्या MIM ने विधानसभेला मुंबईत एक आमदार निवडून आणला आणि इतर काही भागात चांगली मते मिळवली आहेत. मुस्लिम आणि दलित मतांची बेगमी करण्याचा त्यांचा उघड अजेन्डा अनेकांच्या आकांक्षांवर पाणी फिरवू शकतो. याशिवाय अनेक बंडोबाही रिंगणात आहेतच.
          या सगळ्या पार्श्वभूमीवर आयाराम गयारामांची संख्याही लक्षणीय आहे. मुख्य लढत सेना-भाजप मधेच दिसत असून इतर पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करताहेत. सेना-भाजपच्या उमेदवारीला जास्त मागणी असल्याने दोन्ही पक्षांनी अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवार यादी लांबवली. प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा नाराज स्वकियांचीच जास्त भीती दिसून आली. मराठी मतांच्या एकीकरणासाठी मनसेने टाळी द्यायचा प्रयत्न केला पण शिवसेनेने तो झिडकारला. हा आत्मविश्वास आहे की अतिआत्मविश्वास हे मतदान यंत्रे उघडल्यावरच स्पष्ट होईल. मराठी लोकांचा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या सेनेने गुजराती मतांसाठी अनेक गुजराती उमेदवार दिले तर गुजराती लोकांचा पक्ष म्हणून हिणवल्या गेलेल्या भाजपने बहुसंख्येने मराठी उमेदवार मैदानात उतरवले. भाजपने ५०% हुन अधिक महिला उमेदवार देऊन एक चांगले पाऊल उचलले आहे.
          मुंबईतील सगळ्याच लढती किमान पंचरंगी तरी असतील आणि जिंकणारा उमेदवार फार थोड्या फरकाने जिंकेल आणि एखादी कॉलनी निकाल फिरवू शकते. विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघाची पंचरंगी निवडणूक हे याचे उत्तम उदाहरण आहे. MIM चे वारीस पठाण केवळ २०% मते मिळवूनही विजयी होऊ शकले कारण त्यांना न मिळालेली मते इतर चार प्रमुख उमेदवारांमध्ये सारखी (१६% ते १९%) विभागली गेली. महापालिका निवडणुकीत हाच कल सुरु राहील याचीच शक्यता आहे. असे झाल्यास या निवडणुका प्रभागात लढल्या ना जाता बूथ पातळीवर लढल्या जातील आणि मोठ्या नेत्यांच्या भाषणांपेक्षा ज्या पक्षाचा कार्यकर्ता दारोदार पोचून मतदारांना बूथपर्यंत आणू शकेल तोच बाजी मारेल.
          जिल्हा परिषदा आणि इतर ९ महापालिकांसाठीही निवडणुका होणार आहेत पण तरीही मुंबईची निवडणूकच केंद्रस्थानी असेल आणि मुंबईच्या निकालाचे दूरगामी परिणाम होतील. त्यामुळे मुंबईकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. २१ फेब्रुवारी पर्यंत मुंबईत अनेक आरोप-प्रत्यारोप, आश्वासने, चिखलफेक, डरकाळ्या, औकात, मराठी अस्मिता, परके-आपले आणि अशाच असंख्य गोष्टींचा कोलाहल असेल आणि "मुंबई का किंग कौन" याचे उत्तर २२ फेब्रुवारीलाच मिळेल.