Mid life crisis हा प्रश्न नक्की काय आहे आणि "त्याला आपलं काही उत्तर असू शकतं का?" असा विचार मी मागच्या ब्लॉगमध्ये मांडला होता. हा प्रश्न मी ब्लॉगवर जरी आठवड्याभरापूर्वी लिहिला होता, तरी तो मी माझ्या फोनमधल्या नोट्स मध्ये १३ मे २०२४ ला लिहून काढलेला होता. आज जवळपास दोन वर्षांनी त्याचं "मला वाटलेलं उत्तर" लिहायला घेतलं. अर्थात उत्तर मिळवण्याची कधी घाई सुद्धा केली नाही, त्याच्यामुळे कदाचित एवढे दिवस लागले असतील. अर्थात, मला आज जे वाटत आहे, ते त्याचं पक्कं उत्तर आहे असा माझा दावा मुळीच नाही. खरं तर की "Mid Life Crisis" हा प्रश्न आहे का, हेच मला नक्की माहित नाही. आणि प्रश्न नसेल तर त्याचा उत्तर शोधण्याचा आटापिटा कशाला? पण हा एक विचार आहे आणि त्याला उत्तर देणारा एक विचार मांडावा म्हणून आजचा हा लेखनप्रपंच.
नोकरी/व्यवसाय कंटाळवाणा झाला असला किंवा त्यातलं नाविन्य संपलं असलं तरी तो सुरू ठेवणं आवश्यक आहे. त्यावर आपला चरितार्थ सुरू असतो, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडत असतात. आणि त्याच जीवावर इतर विचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं असतं. आता काम करायचंय आहे तर मग त्यात आनंद किंवा नाविन्य शोधायला शिकलं पाहिजे. आपलं काम कोणत्याही क्षेत्रात असो, त्यात नव्या गोष्टी/टेक्नॉलॉजी येतच असतात. त्याचा मागोवा घेतला पाहिजे.
मग आनंद देणाऱ्या छंदाचं काय? सोडून द्यायचा का? नाही, इथे balancing act साधायला हवा. काम करता करता छंद जोपासायचा. कधी कधी भरपूर काम असेल आणि वेळ मिळणार नाही. पण त्यावेळी त्रागा करायचा नाही. इथे old school म्हणजे जुन्या जमान्यातलं व्हायचं. वाट बघायला शिकायचं. सध्याचा वेगवान जगात हे कुठेतरी हरवत चाललं आहे. आपल्याला सगळं इन्स्टंट म्हणजे लगेच हवं असतं. मग ते नूडल्स असो की ॲप वरून ऑर्डर केलेलं साहित्य किंवा आपल्या सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रिया. पोस्ट टाकल्यावर दर दोन मिनिटांनी "कोण काय म्हणालं" किंवा "किती लोकांनी पोस्ट लाईक केली" हे आपण चेक करतो. पण या बाबतीत हेच टाळायचं. वेळ मिळेल तसा छंद जोपासायचा.
परिस्थितीची एक चांगली गोष्ट ही आहे की ती बदलते. अजून काही वर्षांनी मुलं मार्गाला लागली की आपल्या काही जबाबदाऱ्या कमी होतील. तोपर्यंत आर्थिक परिस्थिती पण अधिक बळकट झालेली असेल. आणि मग त्यावेळी जास्त वेळ मिळेल. तेव्हा आवडीची कामे किंवा एखादा छंद जोपासणे अधिक सहजतेने शक्य होईल. आज नोकरी/व्यवसाय हा प्राधान्याचा आहे. तिथे तडजोड नको. त्यातून वेळ काढून कुटुंबासोबत, नातलग आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवून फावल्या वेळात आपल्या छंदाच्या तलवारीला धार काढणे चालू ठेवायला पाहिजे.
पुढे जाऊन आपल्याला आवडेल अशा गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी आज एक काम न चुकता करायला पाहिजे. ते म्हणजे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे. आपण तंदुरुस्त असू तरच पुढच्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. त्यामुळे आपली नोकरी किंवा व्यवसाय "त्याला नाव न ठेवता" करणे, आपल्या माणसांच्या सोबत असणे आणि या सगळ्यात आपला छंद जपणे हे साधे धोरण आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?
आमची एक मैत्रीण म्हणते, "जास्त लोड घ्यायचा नाही, साई. One day at a time." तेही खरंय म्हणा. But, it's a long way to go. घाई कशाला? पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त.
No comments:
Post a Comment