असा मी असामी मधे पु. ल. म्हणतात, "आता अणुयुद्ध टाळायचा एकमेव उपाय ठाऊक असलेला हा दत्तोबा कदम, आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीत चपराशाचं काम का करतो कुणास ठाऊक". आपला अनेकांचा सध्या दत्तोबा कदम झालाय.
आपल्याला काही गोष्टींचा उगाचच बाऊ करायची सवय झालेली आहे. जगात कुठेही काहीही घडलं तरी त्याचा माझ्यावर कसा परिणाम होणार याविषयी जागरूक असावं पण उगाच नको इतकी चिंता आपल्याला का व्हावी?
ताजा विषय म्हणजे गेल्या दोन दिवसात नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून काही आवाहन केलं. जसं की वर्षभर तरी सोनं घेऊ नका, परदेशात फिरायला जाऊ नका, वर्क फ्रॉम होम करा, प्रवास शक्य तितका टाळा किंवा पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरा, इत्यादी. यापैकी बऱ्याचशा गोष्टीशी जास्त संबंध नसताना किंवा त्याचा जास्त परिणाम होत नसताना लोक उगाचच मतप्रदर्शन करत आहेत.
पहिला मुद्दा म्हणजे एक वर्ष तरी सोनं खरेदी करू नका. माझा तसाही काही प्लॅन नव्हता. लोक तर असेही react करत आहेत, जसं दर महिन्याला सोन्याची बिस्किटे खरेदी करतात आणि आता करता येणार नाही.
दुसरा मुद्दा म्हणजे परदेश प्रवास टाळा. २०१८ ला अमेरिकेतून भारतात जो परत आलोय, त्यानंतर मी परदेश या नावाखाली नेपाळला सुद्धा गेलो नाहीये आणि माझा प्लॅन नाहीये, मग मला याचा त्रास का व्हावा? आणि काही लोक असं react करताहेत जसं दर महिन्याला परदेशवारी करतात.
Work from home काही क्षेत्रात शक्य आहे पण काही ठिकाणी अजिबात शक्य नाही. त्या त्या क्षेत्रात तसे निर्णय होतीलच. तसा माझा स्वभावच मुळात बैठा आहे. त्यामुळे उगाच इकडेतिकडे फिरू नका याचा मला फारसा फरक पडत नाही. इथे मात्र लोकांना आपापल्या प्रवृत्तीनुसार थोडाफार फरक पडेल.
पण एखाद्या गोष्टीचा आपल्यावर किती परिणाम होणार याचा विचार न करता उगाच बोंबलत सुटायचं. आता काही गोष्टी नक्की परिणाम करतील. इंधन तुटवडा झाला तर प्रवास कठीण होतील, सार्वजनिक व्यवस्थासुद्धा बाधित होऊ शकेल. सगळ्या वस्तूंचे दर वाढतील, महागाई वाढेल. जागतिक परिस्थितीचा प्रत्येक देशावर कमी अधिक प्रमाणात परिणाम होतंच असतो. जागतिक परिस्थिती सामान्य राहिली नाही तर व्यक्तिगत जीवन देखील सामान्य राहू शकत नाही हे मान्य करायलाच पाहिजे. आणि गोष्टी सामान्य होईपर्यंत करू की सहन थोडे दिवस.
No comments:
Post a Comment