Wednesday, February 8, 2017

मुंबई का किंग कौन


          या महिन्याच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात जिल्हा परिषदा आणि दहा महानगरपालिकांचा समावेश आहे. निवडणुका दर पाच वर्षांनी होताच असतात पण यंदाची गोष्ट थोडी निराळी आहे. गेली कित्येक वर्षे या निवडणुका युती विरुद्ध आघाडी अशाच होत आल्या आहेत. अर्थात अनेक ठिकाणी छोटे पक्ष, अपक्ष आणि ठिकठिकाणच्या शहर/ग्राम विकास आघाड्या अशा निवडणुकांमध्ये सहभागी होतच होत्या, पण मुख्य लढत दोन प्रमुख गटांमध्येच होत आली आहे. या वर्षी विविध कारणास्तव प्रमुख पक्षांनी वेगवेगळे लढायचे ठरवल्याने आता या निवडणुका बहुरंगी आणि बहुढंगी होताना दिसत आहेत आणि हेच यंदाचे वेगळेपण आहे.
          या साऱ्या निवडणुकांमध्येही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक विशेष ठरणार आहे कारण याचे परिणाम केवळ महानगरपालिका जिंकणे/हरणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने गेली २५ वर्षे मुंबईत एकमेकांच्या साथीने निवडणुका लढवल्या आणि ठराविक कालखंड वगळता मुंबई महानगरपालिकेवर सत्ताही गाजवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना गेल्या काही वर्षात मुंबई महानगरपालिका निवडणुकीत लक्षणीय असे यश मिळाले नाही, परंतु शिवसेना आणि भाजप मधील भांडणाचा फायदा करून घेण्याइतकी ताकद तरी या पक्षांकडे शिल्लक आहे का याचे उत्तरही मिळून जाईल. मनसेला गेल्या निवडणुकीत चांगले यश मिळाले होते पण गेले दोन-तीन वर्षातील त्यांची वाटचाल पाहता हि त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असल्यासारखीच आहे. ओवेसींच्या MIM ने काही ठराविक भागात प्रभाव निर्माण केला आहे. पण कोण किती पाण्यात आहे हे समजायला २२ फेब्रुवारीची वाट पाहावी लागेल.
          मुंबई हे शिवसेनेचे जन्मस्थान आणि प्रभावक्षेत्र असल्याने या निवडणुकीचे महत्व शिवसेनेसाठी अधिक आहे. राज्यात शिवसेना भाजप युतीमध्ये शिवसेना प्रभावी राहिली. पण भाजपचा वाढता प्रभाव शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू लागला. याचे पर्यवसान विधानसभेची लढाई वेगवेगळी लढण्यात झाले आणि मुंबईत भाजपपेक्षा एक आमदार कमी निवडून आल्याचा घाव शिवसेनेला जिव्हारी लागला आहे. इतके दिवस आपल्या मर्जीप्रमाणे युती चालवणाऱ्या सेनेला आपली पूर्वीची पत पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मुंबई जिंकणे कळीचे होऊन बसले आहे. गुजराती मतांसाठी सेनेने हार्दिक पटेलला दत्तक घेतले असून त्याला या वर्षीच्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणूनही घोषित केले. अर्थात आमदार व्हायला २५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असताना २३ वर्षाचा हार्दिक मुख्यमंत्री कसा होणार हा प्रश्न वाघाला विचारणार कोण ही गोष्ट निराळी. मुंबई जिंकल्यास मुंबईचे अर्थकारण सेनेला नवसंजीवनी देऊ शकेल. त्याच जोरावर राज्य सरकारमध्ये आधी मंत्रीपदे अथवा "अर्थपूर्ण" खात्यांची मागणी शिवसेना करू शकेल आणि भाजप सरकारला शिवसेनेला अधिक महत्व द्यावे लागेल. परंतु जर शिवसेना स्वबळावर सत्तेवर येऊ शकली नाही आणि भाजपची मदत घ्यावी लागली तर सेनेला मोठा धक्का असेल.
          भारतीय जनता पक्ष एक राष्ट्रीय पक्ष असूनही अनेक वर्ष शिवसेनेचा लहान भाऊ असल्यासारखा होता. अर्थात "बाळासाहेबांच्या" शिवसेनेची ताकद आणि दरारा हे त्यामागील कारण होते. महाजन-मुंडे जोडीने शिवसेनेशी सलोखा ठेवला होता. पण नवे नेतृत्व पुढे येताच एका प्रादेशिक पक्षाची दादागिरी सहन करू नये असा मतप्रवाह भाजपमध्ये तयार झाला. विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवूनही मुंबईत सेनेपेक्षा एक जागा जास्त मिळाल्याने भाजपला हुरूप आला. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्येही युतीची घोषणा झाली पण बहुतांश ठिकाणी सारेच पक्ष स्वतंत्र लढले. या निवडणुकांच्या निकालांनी भाजपच्या शिडात अजून हवा भरलेली दिसते आहे. भाजपने मुंबई जिंकल्यास एक महत्वपूर्ण लढाई जिंकल्याचे आणि शिवसेनेची खोड मोडल्याचे समाधान त्यांना मिळेल. मुंबई हरल्यास प्रतिष्ठा कमी होऊन राज्य सरकार चालवताना सेनेशी जुळवून घ्यावे लागेल. पण मुंबई महापालिका जिंकणे/हरणे हा भाजपासाठी सेनेइतका कळीचा मुद्दा नाही.
          काँग्रेसची मुंबईतील संघटना सध्या वादाने ग्रासली आहे. संजय निरुपम आणि गुरुदास कामत या दोन नेत्यांमध्ये सुरु असलेल्या शीतयुद्धाचा फटका आधीच कमजोर असलेल्या मुंबई काँग्रेसला बसण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेतून काँग्रेसवासी झालेले आणि सध्या मुंबई काँग्रेसचे प्रमुख असलेले निरुपम आणि जुने काँग्रेसी कामत यांची कार्यशैली भिन्न असून त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरु आहे. नारायण राणे यांनीसुद्धा मुंबईत फारसे लक्ष न घातल्यास त्याचेही परिणाम काँग्रेसला भोगावे लागू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील ताकद इतर तीन पक्षांना लढत देण्याइतकी नक्कीच नाही याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही.
          राज ठाकरेंच्या मनसे ने गेल्या निवडणुकांध्ये २८ नगरसेवक निवडून आणत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र सध्या मनसेसमोर गेल्या २-३ वर्षात लागलेली गळती आणि इतर अनेक कारणांमुळे दुरावलेला मतदार असा विचित्र तिढा आहे. मुंबईत एकही आमदार निवडून न आल्याचे मनसेला चांगलेच झोंबले असेल. ओवेसींच्या MIM ने विधानसभेला मुंबईत एक आमदार निवडून आणला आणि इतर काही भागात चांगली मते मिळवली आहेत. मुस्लिम आणि दलित मतांची बेगमी करण्याचा त्यांचा उघड अजेन्डा अनेकांच्या आकांक्षांवर पाणी फिरवू शकतो. याशिवाय अनेक बंडोबाही रिंगणात आहेतच.
          या सगळ्या पार्श्वभूमीवर आयाराम गयारामांची संख्याही लक्षणीय आहे. मुख्य लढत सेना-भाजप मधेच दिसत असून इतर पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करताहेत. सेना-भाजपच्या उमेदवारीला जास्त मागणी असल्याने दोन्ही पक्षांनी अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवार यादी लांबवली. प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा नाराज स्वकियांचीच जास्त भीती दिसून आली. मराठी मतांच्या एकीकरणासाठी मनसेने टाळी द्यायचा प्रयत्न केला पण शिवसेनेने तो झिडकारला. हा आत्मविश्वास आहे की अतिआत्मविश्वास हे मतदान यंत्रे उघडल्यावरच स्पष्ट होईल. मराठी लोकांचा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या सेनेने गुजराती मतांसाठी अनेक गुजराती उमेदवार दिले तर गुजराती लोकांचा पक्ष म्हणून हिणवल्या गेलेल्या भाजपने बहुसंख्येने मराठी उमेदवार मैदानात उतरवले. भाजपने ५०% हुन अधिक महिला उमेदवार देऊन एक चांगले पाऊल उचलले आहे.
          मुंबईतील सगळ्याच लढती किमान पंचरंगी तरी असतील आणि जिंकणारा उमेदवार फार थोड्या फरकाने जिंकेल आणि एखादी कॉलनी निकाल फिरवू शकते. विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघाची पंचरंगी निवडणूक हे याचे उत्तम उदाहरण आहे. MIM चे वारीस पठाण केवळ २०% मते मिळवूनही विजयी होऊ शकले कारण त्यांना न मिळालेली मते इतर चार प्रमुख उमेदवारांमध्ये सारखी (१६% ते १९%) विभागली गेली. महापालिका निवडणुकीत हाच कल सुरु राहील याचीच शक्यता आहे. असे झाल्यास या निवडणुका प्रभागात लढल्या ना जाता बूथ पातळीवर लढल्या जातील आणि मोठ्या नेत्यांच्या भाषणांपेक्षा ज्या पक्षाचा कार्यकर्ता दारोदार पोचून मतदारांना बूथपर्यंत आणू शकेल तोच बाजी मारेल.
          जिल्हा परिषदा आणि इतर ९ महापालिकांसाठीही निवडणुका होणार आहेत पण तरीही मुंबईची निवडणूकच केंद्रस्थानी असेल आणि मुंबईच्या निकालाचे दूरगामी परिणाम होतील. त्यामुळे मुंबईकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. २१ फेब्रुवारी पर्यंत मुंबईत अनेक आरोप-प्रत्यारोप, आश्वासने, चिखलफेक, डरकाळ्या, औकात, मराठी अस्मिता, परके-आपले आणि अशाच असंख्य गोष्टींचा कोलाहल असेल आणि "मुंबई का किंग कौन" याचे उत्तर २२ फेब्रुवारीलाच मिळेल.

1 comment: