Monday, August 5, 2019

३७० चे विसर्जन


आज जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे भारतीय घटनेचे अस्थायी कलम ३७० रद्द ठरवण्याची शिफारस गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत  केली आणि त्यावर राष्ट्रपतींची सही होऊन कलम ३७० तात्काळ प्रभावाने रद्द ठरवण्यात आले. कलम ३७० रद्द होत असताना त्याला अनुसरून आजपर्यंत केलेल्या  सर्व घटना दुरुस्त्या सुद्धा रद्द ठरल्या आणि त्यामुळे कलम ३५-अ सुद्धा रद्द झाले. 

हे कलम ३७० नेमके काय आहे याविषयी थोडे जाणून घेणे आवश्यक आहे. १९४७ साली इंग्रज आपला देश सोडून गेले तेव्हा पाचशेहून अधिक संस्थाने स्वतंत्र झाली. बहुसंख्य संस्थानांनी भारतासोबत विलीनीकरणाचा करार केला आणि भारत एक राष्ट्र झाले. काश्मीरचा राजा हरिसिंग याला भारतातही यायचे नव्हते किंवा पाकिस्तानातही जायचे नव्हते. ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला आणि राजा हरिसिंगाने भारताकडे मदत मागितली. सरदार पटेलांनी मदतीच्या मोबदल्यात काश्मीर संस्थान भारतात विलीन करण्याची अट ठेवली आणि ऑक्टोबर १९४७ मध्ये राजा हरिसिंगाने आपले संस्थान भारतात विलीन केले. त्यानंतर १९४९ मध्ये काश्मीरची तत्कालीन परिस्थिती पाहता कलम ३७० अन्वये काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला. 


 कलम ३७० नुसार भारतीय संसदेला जम्मू काश्मीर मध्ये केवळ संरक्षण, विदेश आणि दळणवळण यासंबंधी कायदे करण्याचा अधिकार आहे. इतर कायदे लागू करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असते.  देशातील इतर राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ पाच वर्षाचा तर जम्मू काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. याच कलमाला आधार करून जम्मू काश्मीर नागरिकत्वाचे कलम ३५ अ अस्तित्वात आले. जम्मू काश्मीरच्या नागरिकांशिवाय बाहेरील कोणालाही राज्यात जमीन विकत घेता येत नाही. जम्मू काश्मीर मधील मुलीने इतर भारतीय राज्यातील मुलाशी लग्न केले तर तिचा पती काश्मीरचा नागरिक होत नाही, पण काश्मिरी मुलीने पाकिस्तानी मुलाशी लग्न केले तर तिचा पती मात्र आपोआप काश्मीरचा नागरिक बनतो. काश्मीरमध्ये शिक्षणाचा अधिकार किंवा माहितीचा अधिकार लागू होत नाही. अशा एक ना अनेक प्रकारे भारतातील इतर राज्यांपेक्षा वेगळ्या तरतुदी जम्मू काश्मीरसाठी मान्य करण्यात आल्या होत्या. 

       
जनसंघाचे नेते डॉ शामाप्रसाद मुखर्जी यांनी कलम ३७० चा तीव्र विरोध केला कारण त्यांच्या मते हे कलम राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोका होते. हे कलम रद्द करणे हे त्यांचे एक लक्ष्य होते आणि त्यांनी संसदेच्या आत आणि बाहेर त्याविरुद्ध लढा दिला. "एक देश मे दो विधान दो प्रधान दो निशान नही चलेंगे" असा नारा देत त्यांनी काश्मीरप्रश्नी लढा उभारला. तेव्हा भारतीयांना काश्मीरमध्ये जाताना ओळखपत्र बाळगणे आवश्यक होते. १९५३ मध्ये बेकायदेशीररित्या काश्मीरमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या प्रयत्नांमुळे ओळखपत्र नियम मागे घेण्यात आला. परंतु मुखर्जीचा अटकेत असतानाच संशयास्पदरित्या मृत्यू झाला. पुढे जनसंघाने आणि त्यानंतर भाजपने कलम ३७० रद्द करणे हा आपला एक संकल्प कायम ठेवला. 


 कलम ३७० रद्द होण्याने बहुतांशी भारतीयांना आनंद झाला आहे. मुख्य म्हणजे भारतीय आणि काश्मिरी अशी दोन नागरिकत्वाची संकल्पना संपून केवळ भारतीय नागरिकत्व शिल्लक राहील. यामुळे काश्मिरी म्हणजेच भारतीय हि भावना वाढीस लागेल. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे. भारताच्या इतर भागाप्रमाणेच काश्मीरलाही विकासयात्रेत सहभागी होता येईल आणि सामान्य भारतीयांनाही भारताचा स्वर्ग म्हणवल्या जाणाऱ्या या भूमीशी जवळीक करणे अधिक सुलभ होईल. काश्मीरमध्ये पर्यटन आणि इतर उद्योग वाढीस लागून त्या भागाचा विकास होण्याला मदत होईल. तथापि हे कलम रद्द होण्याला काही ठराविक घटकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामध्ये मुख्यत्वे जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय पक्ष आहेत. आपल्या मुलांना परदेशात शिकायला पाठवून काश्मिरी जनतेला भारतविरोधी कारवाया करायला लावणारे सय्यद अली शाह गिलानीसारखे  फुटीरतावादी नेते आणि त्यांना पाठिंबा देत आपापल्या पुढील पिढ्यांची सोय करू पाहणारे अब्दुल्ला आणि मुफ्ती यांचे राजकीय पक्ष यांना ३७० कलम हवे आहे कारण हे कलम रद्द झाल्याने यत्तांची दुकाने बंद होत असल्याचे त्यांना दिसत आहे. आता तर जम्मू आणि काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश तर लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश होत आहे. त्यामुळे काश्मिरी नेत्यांचा जळफळाट होतो आहे.

जम्मू आणि काश्मीरचा भारतात विलय ऑक्टोबर १९४७ मध्ये राजा हरीसिंगांच्या सहीने झाला आहे. १९४९ साली तत्कालीन परिस्थिती पाहता भारतीय घटनेत कलम ३७० जोडले गेले. त्या कलमाच्या मसुद्यातच  राष्ट्रपतींच्या सहीने हे कलम रद्द करता येईल अशी सोय आहे. तात्पुरते असलेले कलम सत्तर वर्षानंतर परिस्थिती बदलल्याने रद्द करण्यात आले आहे. याउपर ज्यांना विधवाविलाप करायचा आहे त्यांनी तो खुशाल करावा. 

Thursday, March 15, 2018

विरोधी ऐक्याचे मृगजळ

          १३ मार्च २०१८ च्या संध्याकाळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधींनी आमंत्रित केलेल्या सहभोजनाला जवळपास १८-१९ राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपचा पराभव केला. लागोपाठच्या दिवशी घडलेल्या या दोन घटनांनी मोदी आणि भाजपच्या विरोधकांच्या उत्साहाला भलतेच उधाण आले आणि २०१९ मध्ये आपण सगळे एकत्र येत भाजपाला अशीच धूळ चारणार याची सुखस्वप्ने त्यांना पडायला लागली. भाजपच्या विजयाच्या बातम्या देता-देता ज्यांचे तोंड कडू झाले होते त्या पत्रकारांनीसुद्धा ही भाजपच्या पराजयाची सुरुवात असल्याचे जाहीर करून टाकले. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाचे ऐक्य याचा विचार करावा असे मनात आले.
          प्रथम उत्तर प्रदेश आणि बिहार मधील निकालांविषयी. गोरखपूर आणि फुलपूर या जागा ज्यांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झाल्या ते योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य हे अनुक्रमे ऊत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या ठिकाणी झालेला पराभव व्यक्तिशः त्यांच्यासाठी धक्का आहे यात शंका नाही. इथे बहुजन समाज पार्टीने समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला त्यामागे एक गणित आहे. याच महिन्यात राज्यसभेची निवडणूक आहे आणि बहुजन समाज पार्टीकडे आपला एक खासदार निवडून आणण्याइतकेही संख्याबळ नाही. त्यामुळे त्यांची सारी भिस्त समाजवादी पार्टीकडे उपलब्ध असलेल्या अधिकच्या मतांवर आहे. लोकसभेच्या दोन्ही जागांवर आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसल्याने आणि समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने एक खासदार राज्यसभेत पाठवता येण्याची शक्यता असल्याने मायावतींनी लोकसभेची पोटनिवडणूक लढवली नाही. आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असणाऱ्या मायावती २०१९ मध्ये इतक्याच उदार असतील असे नाही. बिहारमधील अररियाची लोकसभा जागा तेथील राजदचे खासदार महम्मद तस्लिमुद्दीन यांच्या निधनाने रिक्त झाली आणि त्यांच्या मुलाने ती जागा लढवली. अशा प्रकारच्या पोटनिवडणुकीत उमेदवार सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत विजयी होतात हे काही नवीन नाही. तरीही नितीश आणि भाजप एकत्र असूनही पराभव झाला ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
         
आता राहिला प्रश्न १८-१९ पक्षांच्या ऐक्याचा. एकत्र आलेल्या या पक्षांचा राहुल गांधींवर किती विश्वास आहे हे सांगता येत नाही. सोनियांच्या आमंत्रणाला प्रतिसाद देणाऱ्यांनी जर हेच आमंत्रण राहुलकडून आले असते तर असाच प्रतिसाद दिला असता काय याविषयी शंका आहे. या एकत्र आलेल्या लोकांपैकी अनेकजण २०१४ च्या लोकसभेलाही काँग्रेससोबतच होते त्यामुळे विरोधी पक्षांची नव्याने बांधणी करण्यात आली असे जर कोणाला वाटत असेल तर तो एक भ्रम आहे. तसेच यापैकी बहुतेक पक्ष एकाच राज्यात सक्रिय आहेत. उदाहरणार्थ ओमर अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला जम्मू काश्मीरबाहेर काहीही जनाधार नाही किंवा बाबुलाल मरांडी यांच्या प्रजातांत्रिक झारखंड विकास मोर्चाला झारखंडबाहेर कोणीही ओळखत नाही. जितन राम मांझी यांच्या हिंदुस्थान अवाम मोर्चाला खुद्द बिहारमध्ये किती जनाधार आहे याबद्दलही माझ्या मनात शंका आहे. प्रश्न केवळ कोणत्या पक्षाची किती ताकद आहे याचा नाही. या गोतावळ्यात जमा झालेले अनेक पक्ष एकमेकांचे तोंडही पाहणे पसंत करत नाहीत. त्यामुळे या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणे कठीण आहे. त्यासाठी काँग्रेसला खूपच लवचिक व्हावे लागेल आणि प्रसंगी स्वतः कमीपणा घेऊन या मंडळींचे अहंकार जपावे लागतील. हीच पहिली पायरी काँग्रेस कशी पार करते यावर पुढील वाटचाल अवलंबून आहे.
          तेलंगणाचे मुख्यामंत्री के.चंद्रशेखर राव यांनी काँग्रेस व भाजपरहित तिसऱ्या आघाडीची हाक दिली आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी त्या प्रस्तावाला लगेच दुजोरा दिला. याच ममता बॅनर्जींनी आपला एक प्रतिनिधी काँग्रेसच्या प्रीतिभोजनामध्येही पाठवला होता. म्हणजे ममता दीदी दोन्ही दगडावर पाय ठेऊन आहेत. पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यात पूर्ण सत्ता आणि राज्यातील बहुतेक सर्व लोकसभा जागा ताब्यात ठेवणाऱ्या ममता दीदी तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याची स्वप्नं बाळगून आहेत. जयललितांचे निधन झाल्यामुळे आणि नितीश कुमार भाजपच्या गोटात सामील झाल्यामुळे तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व मिळवणे त्यांना सहज शक्य आहे. त्यांच्याशिवाय तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याची धमक असलेला दुसरा नेता म्हणजे शरद पवार. पण पवारांमागे पुरेसे संख्याबळ नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेससोबत लढूनही पवारांना अवघे चार खासदार निवडून आणता आले होते. पवारांच्या विरोधात जाणारी दुसरी गोष्ट म्हणजे या माणसावर भरवसा ठेवता येत नाही. जे बोलतो ते कधी करत नाही अशी यांची ख्याती आहे. नवीन पटनाईक गेली वीस वर्ष ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत आणि लोकसभेसोबतच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकाही होतील. वीस वर्षाची सत्ता, पक्षातील कुरबुरी, भाजपाची राज्यातील वाढती ताकद अशा अनेक कारणांनी ते त्रस्त आहेत. त्यामुळे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यापेक्षा आपली राज्यातील सत्ता कशी टिकेल यावरच त्यांचे लक्ष केंद्रित असेल.
          या साऱ्यांसोबतच सध्या भाजपाप्रणित आघाडीमध्ये असलेले शिवसेना आणि तेलगू देसम पक्ष हेसुद्धा भाजपवर नाराज आहेत. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात एकत्र आले तर भाजपाची साथ सोडलेल्या शिवसेनेला किती यश मिळेल याविषयी शिवसेनाही साशंक आहे. त्यामुळे त्यांचे राजीनामे खिशातून बाहेर पाडायला तयार नाहीत. तसेच आपण भाजपाची साथ सोडली तर भाजप जगन मोहन रेड्डींच्या YSR काँग्रेसशी हातमिळवणी करेल अशी शंका असल्याने तेलगू देसम पक्षही भाजप आघाडीमध्ये टिकून आहे.  याव्यतिरिक्त तामिळनाडूमधील राजकारण अजूनही स्पष्ट नाही. जयललितांचे निधन आणि करुणानिधींची वयपरत्वे खालावलेली प्रकृती, यामुळे तयार झालेली पोकळी भरून काढण्यासाठी तामिळ चित्रसृष्टीचे दोन महानायक कमल हसन आणि रजनीकांत एकमेकांसमोर दंड थोपटून उभे आहेत. कमल हसन यांचा पक्ष जाहीर झाला असून रजनीकांत यांचा अधिकृत राजकारण प्रवेश व्हायचा आहे. येत्या सहा महिन्यात हे दोघेही आपापल्या भूमिका स्पष्ट करतील. देशातील प्रामाणिकपणाचा मक्ता घेतलेली आम आदमी पार्टी काय करणार हे ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही. त्यातच या महिन्यात अण्णा हजारे आणखी एक आंदोलन करणार आहेत. तिथे पुन्हा एखादा केजरीवाल जन्मास येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या सगळ्या शक्याशक्यता असताना २०१९ ची निवडणूक आताच जिंकल्याचा विरोधी पक्षांचा उत्साह म्हणजे भैंस ने दूध दिया नाही ,और ये चले दही बेचने असाच आहे.
          पोटनिवडणूक आणि देशव्यापी निवडणूक यामध्ये खूप फरक असतो. राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला. तेव्हाही भाजपाची गाडी उताराला लागली असे विद्वानांनी म्हटले. पण महिन्याभरातच पूर्वोत्तर राज्यांचे निकाल लागले आणि अशा पंडितांना तोंडात मारल्यासारखे झाले. पोटनिवडणुकीमुळे सत्तारूढ सरकार टिकण्यावर काहीच फरक पडत नसतो त्यामुळे मतदारही फारशा उत्साहात नसतात.  त्यामुळे पोटनिवडणुकीत होणारे मतदानही कमी असते. पण जेंव्हा २०१९ मध्ये देशव्यापी
निवडणूक होईल आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी कौल मागतील तेव्हाचे चित्र पोटनिवडणुकीपेक्षा वेगळे असेल. कारण ती निवडणूक सरकार निवडण्याची असेल आणि  मोदी नाही तर कोण या प्रश्नाचे उत्तर अजून विरोधी पक्षांनाही सापडले नाहीये. त्यामुळे असे विरोधक जनतेपुढे जाताना मोदीविरोधाशिवाय दुसरा कोणता मुद्दा नेणार हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत झालेले विजय २०१९ मध्ये जसेच्या तसे पुन्हा होतील असे नाही हे भाजपाविरोधकांनाही माहित आहे. म्हणूनच हार्दिक पटेल म्हणतो की भाजप लहानसहान निवडणूक हरते कारण मोठ्या निवडणूका जिंकल्यावर मतदान यंत्रामध्ये गडबड झाल्याचे आरोप होऊ नयेत. गेल्या आठ निवडणुकांपासून ताब्यात असलेला गोरखपूरचा गड गमावल्याने भाजप समर्थक नक्कीच नाराज असतील. पण दुःखी असलेल्या भाजप समर्थकांना आणि भाजपच्या पराजयाने खुश झालेल्या सगळ्यांनाच हे माहित आहे की अजून सहा महिन्यात मोदी प्रचाराला बाहेर पडतील तेव्हा परिस्थिती वेगळी असेल आणि देशातील मतदार त्यावेळी केवळ एखादा खासदार निवडण्यासाठी नव्हे तर पुढील पाच वर्षे चालणारे सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. 
          सध्या काही पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या विजयाची धुंदी वेळेत उतरली तर विरोधी पक्ष २०१९ मध्ये भाजपाला काही आव्हान देऊ शकतील. नाहीतर २०१९ चा निकाल आजच सांगणे काही कठीण नाही - कहो दिल से ... नरेंद्र मोदी फिर से 

Tuesday, December 19, 2017

२०१९ चा शंखनाद


गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकांचे सूप वाजले आणि आता हा आठवडा विश्लेषणांमध्ये खर्ची पडेल. भाजपने गुजरात राखत हिमाचल प्रदेश काँग्रेसकडून हिसकावले म्हणून भाजपचे लोक आनंद साजरा करतील. तर आपल्या नव्या अध्यक्षाने गुजरातमध्ये भाजपच्या तोंडाला कसा फेस आणला याच्या चर्चा काँग्रेसी करतील. या दोन्ही पक्षात नसलेले आपापल्या सोयीप्रमाणे निकालांचा आढावा घेतील आणि प्रसारमाध्यमे आठवडाभरानंतर आता नवा TRP कुठे मिळेल याची चिंता करतील. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निकालानंतरच्या भाषणातून २०१९ साठीचा शंखनाद केला आहे यात काही संशय नाही.

गुजरात आणि हिमाचलच्या यशापयशातून दोन्ही पक्षांना काही शिकण्यासारखे आहे आणि त्यानुसार सुधारणा करणे गरजेचे आहे. पण त्यासाठी आधी आपले काही चुकले आहे हे समजणे जास्त महत्वाचे आहे.  पाटीदार आंदोलनाची पार्श्वभूमी, हार्दिक पटेल-जिग्नेश मेवानी-अल्पेश ठाकोर या युवकांची साथ, GST आणि नोटबंदीमुळे व्यापारी वर्गातील तथाकथित नाराजी, सौम्य हिंदुत्वाचा पुरस्कार केलेले राहुल गांधी, २२ वर्षांपासून असलेली भाजपची सत्ता आणि त्यात भर म्हणून यंदा भाजपाकडे मुख्यमंत्रीपदासाठी मोदींसारखा प्रभावी चेहरा नव्हता. एवढे सगळे जमून आले म्हणजे काँग्रेसला विजयासाठीची चांगली संधी होती. एवढे असूनही आपण सत्तापरिवर्तन का घडवून आणू शकलो नाही याचा विचार काँग्रेस करेल अशी आशा आहे. अर्थात गेल्या वेळच्या ६१ वरून आता ८० पर्यंत पोचलो यात आनंद मानायचा असेल तर मग विषयच संपला. काँग्रेसप्रमाणेच भाजपलाही आपल्या यशाची मीमांसा करण्याची गरज आहे. गुजरात हे नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे गृहराज्य असल्याने हा विषय भाजपच्या प्रतिष्ठेचा होता. २२ वर्षाच्या सत्तेमुळे झालेले प्रस्थापितविरोधी वातावरण असूनही आपण सत्ता कायम ठेवली म्हणून भाजपने प्रकटपणे आपली पाठ थोपटून घ्यावी. पण आपण अपेक्षेप्रमाणे यश मिळवू शकलो नाही हे भाजप नेते खाजगीत मान्य करतील. आणि हे मान्य करता आले तरच काही दुरुस्ती करता येईल.

अर्थात २०१९ चा विचार करायचा असेल तर काही महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकावा लागेल. यापैकी महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रभावी प्रादेशिक नेतृत्व. मोदी-शाह असोत नाहीतर राहुल गांधी, राष्ट्रीय नेते देशात किती ठिकाणी पोहोचू शकतात याला मर्यादा असणार आहेत. त्यामुळे प्रभावी प्रादेशिक नेते राष्ट्रीय नेतृत्वाच्या खांद्यावरचा काही भार आपल्या खांद्यावर वाहून नेऊ शकतात. भाजपाबद्दल सांगायचे झाले तर योगी आदित्यनाथ, वसुंधरा राजे, शिवराज सिंग चौहान, देवेंद्र फडणवीस, रमण सिंग, येडियुरप्पा, हेमंत बिस्वा शर्मा ,धर्मेंद्र प्रधान, मनोहर पर्रीकर अशा प्रभावी प्रादेशिक नेत्यांची फौज मोदी-शाह जोडीच्या मदतीला आहे. या नेत्यांना त्यांच्या त्यांच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जनाधार आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही वेळोवेळी प्रदेश नेतृत्वाचे हात बळकट केले आहेत. असे करताना हे लोक आपली जागा बळकावतील अशी भीती केंद्रीय नेतृत्वाला वाटत नाही. याच्या अगदी विरुद्ध, काँग्रेसने स्थानिक नेतृत्वाला एका ठराविक मर्यादेपलीकडे बळ न देण्याचे धोरण अमलात आणले आहे. त्यामुळे राज्य पातळीवरील प्रत्येक लहानमोठा निर्णय केंद्रीय नेतृत्वाला विचारल्याशिवाय होऊ शकत नाही. पुरेसे स्वातंत्र्य नसल्याने आणि आपण फार लोकप्रिय झाल्यास आपले पंख कापले जातील या भीतीने काँग्रेसचे स्थानिक नेते पूर्ण क्षमतेने काम करताना दिसत नाहीत. आंध्र प्रदेशातील वाय एस राजशेखर रेड्डींनंतर पंजाबातील अमरेंद्र सिंगांचा अपवाद वगळता काँग्रेसमध्ये प्रभावी प्रादेशिक नेत्याचा अभाव प्रकर्षाने दिसून येतो आहे.

दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या दूरदृष्टीमध्येही सध्या प्रचंड तफावत आढळते. आगामी काळात काय आव्हाने आहेत आणि त्याचा कसा सामना करता येईल याचा विचार करण्यामध्ये आजच्या घडीला भाजप काँग्रेसपेक्षा फार पुढे आहे असे चित्र दिसते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड मध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. परंतु आता मित्र पक्षांपैकी शिवसेना आणि तेलगू देसम पक्ष सरकारवर नाराज आहेत. अकाली दलाची शक्ती क्षीण झाली आहे. त्यामुळे पाच वर्षांनंतर हे यश टिकवणे काहीसे कठीण असेल. मोदी आणि शहांना याची जाणीव आहे. आणि त्यामुळेच २०१४ नंतर भाजपने नव्या प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्यावर भर दिला आहे. केरळ, बंगाल, ओडिशा आणि पूर्वोत्तर राज्यातील गेल्या दोन वर्षातील स्थानिक निवडणुकांमध्ये याची झलक पाहायला मिळते. त्याचप्रमाणे तामिळनाडूमधील AIADMK  सोबत जुळवून घ्यायचे प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत आहेत. बिहारमध्ये नितीशना पुन्हा  NDA मध्ये सामावून घेणे हाही याचाच एक भाग आहेत. २०१४ मध्ये जिथे पक्ष कमी पडला तिथे सुधारणा करण्याचा आणि जिथे प्रचंड यश मिळाले तिथे यशाची पुनरावृत्ती न झाल्यास त्याचा पर्याय शोधायचा प्रयत्न भाजप नेतृत्वाने गेल्या ३-४ वर्षात केला आहे. पश्चिम आणि उत्तर भारतात २०१४ साली मिळालेले यश २०१७ मध्ये थोडे कमी झाले तर त्याची भरपाई करण्यासाठी पूर्व आणि दक्षिण भागात अधिक यश मिळवण्यावर भाजपचा भर असेल.

भाजपच्या निवडणूक लढवण्याचा पद्धतीबद्दलही अनेक लोकांनीं अनेक प्रकारे चर्चा केली आहे. २००७ च्या गुजरात निवडणुकीमध्ये अमित शहांनी पन्ना प्रमुख नावाची संकल्पना मांडली आणि त्या वर्षीच्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये याचा चांगला परिणामही दिसून आला. मतदार यादीतील प्रत्येक पानावर साधारण २५-३० मतदारांची नावे असतात आणि प्रत्येक पन्ना प्रमुखाकडे त्या २५-३० जणांना मतदानाच्या दिवशी केंद्रावर घेऊन येणे आणि भाजपच्या बाजूने मतदान घडवून आणणे याची जबाबदारी असते.  पण पन्ना प्रमुख केवळ निवडणुकीच्या दिवशी सक्रिय होत नाहीत. निवडणुकीच्या आधीपासून आपल्या पानावरील मतदारांचा कौल काय आहे याचा अभ्यास हे पन्ना प्रमुख करतात. त्याच सोबत बूथ, मतदारसंघ आणि जिल्हा पातळीवरील निरीक्षकांच्या माध्यमातून ही माहिती गोळा करून वातावरण आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा भाजपाची संघटना अमित शहांनी बांधली आहे आणि हेच त्यांच्या गेल्या काही वर्षातील यशाचे गमक आहे. भाजपच्या या प्रयत्नांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील इतर संघटनांचे पाठबळ मिळते.  भाजपच्या याच रणनीतीचा मुकाबला करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न जागोजागी तोकडा पडताना दिसत आहे.

काँग्रेसला भाजपशी दोन हात करण्यासाठी जेवढे जास्त सहयोगी मिळतील तेवढे गोळा करावे लागतील. आपापल्या प्रदेशात भाजपकडून मार खाल्लेले प्रादेशिक पक्ष सहजपणे काँग्रेसच्या गोटात दाखल होऊ शकतात. पण त्यासाठी आपण एक सशक्त पर्याय आहोत हे काँग्रेसला सिद्ध करावे लागेल. संघटना नव्याने बांधायची असेल तर दीड वर्षाचा कालावधी पुरेसा आहे की नाही यावर मतभिन्नता असू शकेल. पण देशाच्या कानाकोपऱ्यात काँग्रेसचे अस्तित्व आहे हे नाकारता येणार नाही. नोटबंदी आणि ऑनलाईन पेमेंट यामुळे सामान्य जनतेला थोडा फरक पडला असला तरी अनेकांची दुकाने बंद झाली आहेत. अशा सगळ्यांचा भाजपाला विरोध आहे. NGO  ना मिळणाऱ्या परदेशी निधीवर बंधने आणल्यामुळे अनेक NGO सुद्धा भाजपाला हटवण्यासाठी उत्सुक आहेत. काँग्रेसला त्यांचाही फायदा होऊ शकेल. प्रसारमाध्यमांमधील अनेक पत्रकार भाजप सरकारला खाली खेचण्यासाठी देव पाण्यात ठेऊन बसलेत. तेसुद्धा भाजपाविरोधात विखारी प्रचार करू शकतील. अर्थात, या साऱ्यांचा फायदा घेण्याइतकी काँग्रेस मजबूत आहे का हाच मोलाचा प्रश्न आहे.

गुजरात निवडणुक निकालानंतरचे मोदींचे भाषण 'जीतेगा भाई जीतेगा, विकास ही जीतेगा' या घोषणेने संपले. त्यावरून विकास हाच भाजपचा यापुढेही (जाहीरपणे सांगण्यापुरता तरी) मुद्दा असेल हे स्पष्ट होते. पण खरंच केवळ विकास या मुद्द्यावर मोदी पुन्हा बाजी मारू शकतील? जानेवारी २०१८ मध्ये राम मंदिर विषयाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु होईल. निकाल काहीही लागला तर देशात ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेली ३ दशके भाजपचे राजकारण राम मंदिर मुद्द्याला धरून चालले आहे आणि जर मंदिराच्या बाजूने निकाल लागला तर भाजप त्याच्या पुरेपूर फायदा उचलणार हे नक्की. आणि त्यांना असा फायदा मिळू नये म्हणून काँग्रेसही सर्वतोपरी प्रयत्न करेल. सरकार स्थापन होऊन साडेतीन वर्षांनंतरही भ्रष्टाचाराचा एकही आरोप सरकारवर झाला नाही हा मात्र काँग्रेससाठी चिंतेचा विषय असणार आहे. त्यामुळे सरकारच्या विकासाच्या दाव्याला विरोध करण्यासाठी एखादा भावनिक मुद्दा तयार करण्याकडे काँग्रेसचा कल असेल. तिहेरी तलाक मुद्द्यावर कायदा करण्यावरून मुस्लिम समाजात उभी फूट पडली आहे. सरकारने धार्मिक बाबीत ढवळाढवळ करू नये असे मानणाऱ्यांचा एक गट तर बहुतांश महिला आणि उदारमतवादी लोकांचा दुसरा. त्यामुळे बहुसंख्य-अल्पसंख्य असा मुद्दा काँग्रेसला यापुढे फारसा फायदेशीर असेल असे वाटत नाही. हे काँग्रेसच्याही लक्षात आले असावे. राहुल गांधींच्या गुजरातमधील मंदिर भ्रमंतीवरून हा अंदाज काढता येणे शक्य आहे. अर्थात येणाऱ्या १६-१७ महिन्यात किती मुद्दे तयार होतात, कोणाची किती प्रकरणे बाहेर येतात आणि कोणकोणते नेते कोणकोणत्या कळपात दाखल होतात हे आत्ताच सांगता येणार नाही.

पण दोन्ही महत्वाचे राष्ट्रीय पक्ष आणि आपापल्या राज्यात प्रभावी असलेले प्रादेशिक पक्ष तयारी कशी करतात हे पाहणे कुतूहलाचे ठरेल. दीड वर्ष हा तसा मोठा काळ आहे. २०१८ मध्ये एकूण आठ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार असून त्यामधून हळूहळू संकेत मिळतीलच. गुजरातेत निवडणुकीआधी महिनाभरपर्यंत काँग्रेसने मुसंडी मारली होती पण तीन चार आठवड्यात मोदींनी पारडे फिरवले. पण तीन आठवड्यात जसा गुजरात पिंजून काढता आला तसा पूर्ण देश पिंजून काढायला तीन आठवडे पुरणार नाहीत हे मोदींच्या लक्षात आले आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश गमावून आणि गुजरातमध्ये परिवर्तन घडवण्यात अपयशी ठरवूनही काँग्रेस आपला नैतिक विजय कसा झाला हे सांगण्यात मश्गुल आहे आणि निकाल लागायच्या एक दिवस आधी मोदी मेघालयमध्ये प्रचाराचा नारळ फोडून आलेसुद्धा. राहुल गांधी नव्याने काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. आपण जर काही वेगळे केले नाही तर काही वेगळे परीणाम दिसणार नाहीत नाही हे त्यांच्या लक्षात आले म्हणजे झाले. पण काँग्रेसचा गेल्या ३-४ वर्षातील प्रवास पाहता २०१९ च्या मे महिन्यातही आपण हेच ऐकण्याची दाट शक्यता आहे  - मै, नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर कि शपथ लेता हू ......  

Tuesday, October 24, 2017

देणे ब्लूमिंग्टनचे

IT क्षेत्रात काम करत असणाऱ्या अनेकांच्या पायाला भिंगरी लागलेली असते, तशीच माझ्याही पायाला लागली आणि गेल्या १०-१२ वर्षात अनेक ठिकाणी वास्तव्य करायचा योग्य आला. साधारण वर्षभर वास्तव्य केल्यावर एखादे शहर सोडताना लागणारी हुरहूर तशी सवयीचीच. पण यावेळची गोष्ट जरा निराळी होती.  ब्लूमिंग्टनने आम्हाला एवढं भरभरून दिलं की हे छोटंसं गाव आपल्याला निरोप घेताना एवढं रडवेल अशी कल्पनाही मी केली नव्हती.

२०१६ च्या जून मध्ये माझा कॅन्ससमधील ओव्हरलॅन्ड पार्क मधला प्रोजेक्ट संपला आणि मग नेहमीप्रमाणेच नवा प्रोजेक्ट, नवं शहर, नवे लोक अशा सगळ्या नव्या गोष्टीसाठी आम्ही तयार झालो. लवकरच समजलं की आता आपला नवा पत्ता ब्लूमिंग्टन असणार आहे. फिरण्यासाठी शिकागोला गेलो असता, शिकागोहून ओव्हरलॅन्ड पार्कला परत येताना आम्ही वाटेत ब्लूमिंग्टनला भेट दिली आणि हे शहर नसून एक लहानसं गाव आहे अशीच आमची पहिली प्रतिक्रिया झाली. पण पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणून आम्ही ठरल्याप्रमाणे जुलै २०१६ मध्ये ब्लूमिंग्टनला राहायला आलो.

पण आमचे सगळे अंदाज चुकवणारं हे गाव निराळंच होत. या गावाने आम्हाला अगदी अलगद जवळ केलं आणि आल्यापासून तिसऱ्याच दिवशी आम्ही मराठी मंडळाच्या परिवारात सामील झालो. गणेशोत्सवात लहान मुलांच्या कार्यक्रमाच्या मीटिंगपासून सुरु झालेला हा प्रवास मग एकामागोमाग एक नवे अनुभव देत गेला. गौतम आणि गौरी करंदीकरांचे घर हाच ब्लूमिंग्टनच्या मराठी मंडळाचा पत्ता. अनेक गोष्टी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा करत होतो आणि या सगळ्यातून मला माझी नवी ओळख होत गेली. मग तो ढोलपथकातला सहभाग असो नाहीतर स्किटमधे केलेली लहानशी भूमिका. स्टेजवर काम करणं हे मला इतका आनंद देऊन गेलं की आपण हे आधी का केलं नाही याचं मला आश्चर्य वाटलं आणि त्यानंतर जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा स्टेजवर काम करायला नाही म्हणायचे नाही हे मी मनोमन ठरवून टाकलं.

त्याचप्रमाणे ब्लूमिंग्टनमध्ये हिंदू स्वयंसेवक संघाची (HSS) शाखा लागते असं समजलं आणि मी लगेच तिथेही हजेरी लावली. फार वर्षांपूर्वी शाळेत असताना मी संघाच्या शाखेत जात असे, पण ब्लूमिंग्टनमध्ये शाखेवर हजेरी लावेन अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. शाखेच्या लोकांनीही मला प्रोत्साहन देत अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि मी माझ्या कुवतीप्रमाणे त्या पार पाडल्या. अर्थात संघात जबाबदारी कुणा एकाची अशी नसतेच. तुमची जबाबदारी पार पाडायला प्रत्येकजण तुम्हाला मदत करतो. शाखेच्या निमित्ताने मी अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झालो आणि त्यामुळे अनेक नव्या ओळखी झाल्या ज्यांचा मला आजही माझ्या नव्या जागी म्हणजे अटलांटामध्ये उपयोग होतो आहे.

दरवर्षी सादर होणारी नाटकं हे ब्लूमिंग्टनच्या मराठी मंडळाचं खास वैशिष्ट्य. गौतम करंदीकरांच्या दिग्दर्शनाखाली गेली अनेक वर्षे ही नाटकं सादर होत आली आहेत. दरवर्षीचं नाटक हे ब्लूमिंग्टनबरोबरच मिलवॉकी आणि सेंट लुई अशा दोन ठिकाणीही सादर केलं जातं. या नाटकासाठीची पात्रनिवड अतिशय गुप्त पद्धतीने होते. "आमच्या नाटकात काम करायला या होSSS" असं जाहीर आमंत्रण दिलं जात नाही. गौतमदादांच्या मनात नाटक ठरतं आणि त्यांना आसपासच्या लोकांमध्ये कलाकार दिसतात. भूमिकेला साजेसे कलाकार हेरून त्यांना आमंत्रण जातं आणि तालीम सुरु होते. परंतु मराठी मंडळाकडून नाटकाची जाहिरात प्रकाशित होईपर्यंत "कोणतं नाटक?", "कोण कलाकार?" यापैकी काहीही गोष्टी नाटक टीमबाहेरच्या जगाला समजत नाहीत.

स्किटमध्ये काम केल्यावर स्टेजवर काम करायची माझी इच्छा होतीच. त्यामुळे एकदा नोव्हेंबर मध्ये मी अंदाज घेत घेत गौतमदादांना नाटकाबद्दल विचारलं आणि म्हणालो की नाटकात काही काम असेल तर सांगा. तेव्हा मला समजलं कि नाटक आधीच ठरलं होतं आणि कलाकारही फायनल झाले होते. फार खिन्न मनाने घरी आलो आणि काही दिवसातच काही अजून काही अशीच माणसं सापडली. त्यापैकी प्रत्येकाला नाटकात काम करायचं होतं असं नाही पण लहानसं स्किट करायला ही सगळीच मंडळी उत्सुक होती. आम्ही सर्वानी मिळून एक नौटंकी ग्रुप तयार केला आणि मग एक स्किट लिहून संक्रांतीला सादर केलं. विनिताला काही दिवसांनी नाटकासाठी बदली कलाकार म्हणून आमंत्रण आलं. बाकीच्या आम्ही मात्र दुधाची तहान ताकावर भागवली. काही दिवसातच शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करायचं ठरलं आणि त्यानिमित्त सादर होणाऱ्या स्किटच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची संधी मला मिळाली. शिवजयंतीच्या स्किटमध्येही मी एक भूमिका करून घेतली. संक्रांत आणि शिवजयंती अशा दोन्ही स्किटमध्ये स्टेजवर जायची हौस भागवून घेतली खरी, पण मराठी मंडळाच्या नाटकात काम करायचं मात्र राहून गेलं.

या सगळ्यांबरोबर ब्लूमिंग्टनने आम्हाला मित्रांचा गोतावळा दिला. गेल्या वर्षी आम्ही ब्लूमगावात आल्यावर गणपतीच्या सुमारास खूप नव्या ओळखी झाल्या. मग नवरात्रीच्या काळात काही जणांशी ओळख दृढ झाली आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आम्ही पाच कुटुंबांनी एकत्र भेटायचं ठरवलं. काही नव्याने आलेले आणि काही थोडे जुने असे असलेल्या आमची ही एक सहज साधी भेट होती. आमच्यापैकी सुशील आणि अनुजा ब्लूमगावात अनेक वर्षे राहिलेले तर अण्वेश आणि वल्लरी हे आमच्या आधी काही आठवडे गावात आलेले. योगेश-सीमा आणि हितेश-स्मिता हे गावात अगदी जुने नसले तरी आमच्यापेक्षा ब्लूमगावचे दोन पावसाळे जास्त पाहिलेले (ब्लूमिंग्टनची थंडी बघता खरंतर थंडीचे दोन मोसम जासत पाहिलेले असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल). पण या एका भेटीत बंध असे जुळून आले की जणू काही आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत असू. त्यानंतर आम्ही नियमितपणे एकत्र भेटू लागलो. कधी कुणाचा वाढदिवस म्हणून तर कधी एखादी लहानशी सहल म्हणून, तर कधी उगाचच कसल्याही कारणाशिवाय. तसं पाहिलं तर अशी अनेक माणसं आहेत ज्यांना मी वर्षानुवर्षे ओळखतो, त्यांच्याकडे जाणंयेणंही असतं पण त्यांच्यासोबतचं नातं त्यापुढे सरकत नाही. पण या ब्लूमगावकरांसोबत एका वर्षात एवढे मिसळून गेलो की विचारता सोय नाही. या लोकांनी न मागता आम्हाला भरभरून दिलं. एवढं की त्याचं काही मोजमाप करता येणार नाही.

ब्लूमिंग्टनला आल्यापासून वर्षभरातच पायाला लागलेली भिंगरी पुन्हा एकदा फिरली आणि आम्हांला ब्लूमिंग्टन सोडावं लागणार अशी चिन्ह दिसायला लागली. ब्लूमिंग्टनमधेच राहून नव्या प्रोजेक्टवर काम करता आले तर बघ असा आपुलकीचा सल्लाही काही जणांनी दिला. त्यानुसार मी काही प्रयत्न करून पहिलेही. पण आपण ज्या देशात असू तिथल्या सरकारचे कायदे तर पाळावेच लागणार. शेवटी आम्ही इथे येताना, ज्या शहरात काम त्या शहरात मुक्काम अशा धोरणाखालीच आलो आहोत. त्यामुळे ब्लूमगाव सोडावे लागले. मनाची तयारी होत नव्हती आणि आता जायचेच आहे तर शक्य तितक्या उशिरा जावे असेही वाटत होते.

ब्लूमिंग्टन सोडायच्या आधीचे २ आठवडे अनेक मित्र-आप्तेष्टांनी आम्हाला संध्याकाळच्या जेवणाचे निमंत्रण दिले आणि आम्ही वार लावल्यासारखे रोज कुणाच्या ना कुणाच्या घरी जेवायला जाऊ लागलो. यावेळी होणाऱ्या गप्पांना एकमेकांपासून लांब जाण्याच्या जाणिवेचा बॅकड्रॉप होता. भेटून चांगलं वाटत होतंच पण या भेटींना "पुन्हा कधी भेट होईल माहित नाही" अशा निराशेशी झालरही होती. अखेरीस आमचा ब्लूमिंग्टन सोडायचा दिवस आला. घरचे सामान आधीच पाठवून दिले होते. त्यामुळे आठवड्यासाठी लागणारे साहित्य सोबत ठेवून आम्ही निघायचे ठरवले. सकाळी १० वाजता निघायचं ठरवलं पण पाय निघेना. सकाळी सगळे ब्रेकफास्टला एकत्र जमलो आणि मग अजून काही मित्रांनीही निरोप देण्यासाठी हजेरी लावली. आजचा एक दिवस रहा आणि उद्या निघा अशीही गळ घातली गेली. पण चोवीस तासानंतरही निरोप घेताना परिस्थिती तीच असणार होती. त्यामुळे मनाचा हिय्या केला आणि ठरल्या वेळेपेक्षा ३ तास उशिराने आम्ही अटलांटाला जाण्यासाठी गाडीत बसलो.

माझं जन्मगाव खेड आणि त्यानंतर शाळा कॉलेजच्या निमित्ताने जिथे राहिलो ते रत्नागिरी सोडलं तर इतर दुसऱ्या कुठल्याही गावापेक्षा ब्लूमिंग्टनने आम्हाला सर्वात जास्त लळा लावला. पण कोणत्या म्युन्सिपालिटीचं पाण्याचं बिल कोणी किती दिवस भरायचं हेही नशिबाने आधीच लिहिलेलं असतं. त्यानुसार ब्लूमिंग्टनमधील शेवटचं पाण्याचं बिल भरलं आणि आणि त्यातलंच थोडंसं पाणी डोळ्यात ठेऊन आम्ही ब्लूमिंग्टनचा निरोप घेतला.

Wednesday, August 9, 2017

गुजरात राज्यसभा निवडणूक आणि राष्ट्रीय राजकारण


          साधारणपणे राज्यसभा निवडणूक ही एवढ्या शांतपणे होऊन जाते की सामान्य माणसाला पत्ताही लागत नाही. पण काल ८ ऑगस्ट ला गुजरात राज्यातील तीन राज्यसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा केवळ पत्ता लागला एवढेच नाही तर ही निवडणूक २ आठवड्यांपासून गाजत राहिली आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तर क्रिकेटच्या २०-२० सामन्याप्रमाणे उत्कंठावर्धक होत गेली. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागला यापेक्षा या निवडणुकीदरम्यान झालेल्या घटनाक्रमाचा पुढील राजकारणावर होणार परिणाम जास्त महत्वाचा आहे.

          गुजरातमधून राज्यसभेवर जाणाऱ्या तीन खासदारांचा कालावधी संपल्यामुळे गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली. निवृत्त होणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन आणि काँग्रेसचा एक खासदार होता. गुजरात विधानसभेतील भाजप आणि काँग्रेसचे संख्याबळ लक्षात घेता पुन्हा एकदा भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक खासदार निवडून येईल हे स्वाभाविकच होतं. भाजपने आपल्या निश्चित असलेल्या दोन जागांसाठी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले. काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आणि अतिशय निरस ठरू पाहणाऱ्या निवडणुकीचे स्वरूप पालटून गेले.

शंकरसिंह वाघेला हे पूर्वाश्रमीचे भाजपाचे बडे प्रस्थ होते. १९९५ मध्ये गुजरात विधानसभा निवडणूक भाजपने जिंकल्यावर वाघेला मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. त्यांना डावलून केशूभाई पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले. यामध्ये त्या वेळी राज्याच्या संघटनेमध्ये सक्रिय असलेल्या नरेंद्र मोदींचा केशूभाईंना असलेला पाठिंबा हे एक कारण होते असे म्हणतात.वाघेलांनी बंड केले आणि मग भाजपने केशूभाईंना हटवून त्यांच्या जागी वाघेला समर्थक असलेल्या सुरेश मेहतांना मुख्यमंत्री केले. पुढे १९९६ मध्ये लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर वाघेलांनी आपल्या समर्थकांसह भाजपाला रामराम ठोकला, स्वतःचा पक्ष काढला आणि काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. तेही दुकान फार काळ चालले नाही आणि मग १९९७ मध्ये वाघेलांनीं दिलीप पारीख यांना खुर्ची दिली. पुढे १९९८ मध्ये वाघेलांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि काँग्रेसी बनले. त्याच वर्षी राज्यात मध्यावधी निवडणूक होऊन भाजपने सत्ता काबीज केली ती आजतागायत टिकून आहे. आता १८-१९ वर्षानंतर वाघेलांना काँग्रेसमध्ये करमेनासे झाले आणि यंदा विधानसभा निवडणूक होऊ घातलेली असताना आणि ऐन राज्यसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर वाघेलांनी काँग्रेसला रामराम केला.

विधानसभेमध्ये स्वतःचे ५७, राष्ट्रवादीचे २ आणि जनता दल (यु) चा एक असे ६० आमदार पाठीशी असताना आणि विजयासाठी केवळ ४५ मतांची गरज असताना अहमद पटेलांना निवडून येण्याविषयी काहीच अडचण नव्हती. पण ऐन निवडणुकीआधी ६ आमदारांनी भाजपचा रास्ता पकडला. वाघेला आणि समर्थक विरोधात उभे ठाकले. राष्ट्रवादीने आपल्या लौकिकाला जागून ठामपणे कोणाचीच बाजू घेतली नाही आणि जनता दल (यु) ने बिहारमध्ये भाजपशी सलगी केल्याने ते एक मतही मिळेल याची शाश्वती राहिली नाही. अशा प्रकारे २ महिन्यांपूर्वी ६० जणांचे पाठबळ आता ४४ वर येऊन ठेपले. आता या लोकांमध्ये अजून फूट पडू नये म्हणून काँग्रेसने २ आठवड्यांपूर्वी या ४४ लोकांना काँग्रेसशासित कर्नाटकमधील एका रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवले आणि ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. अहमद पटेल हे सोनिया गांधींचे सल्लागार आणि त्याचमुळे पटेलांचा विजय म्हणजे सोनियांच्या प्रतिष्ठेची लढाई होती. गुजरातमध्ये पूरस्थिती असताना आपले आमदार कर्नाटकातील फाईव्ह स्टार रेसॉर्टमधे ठेवणे हे ३ महिन्यावर आलेल्या निवडणुकीसाठी धोक्याचे आहे हे न समजण्याइतके काँग्रेस नेते मूर्ख नाहीत. पण अहमद पटेलांच्या विजयासाठी हा धोका पत्करला यातूनच काँग्रेससाठी या निवडणुकीचे किती महत्व होते ते दिसून येते.

अमित शाह निवडणूक लढण्याच्या कलेमध्ये कुशल आहेत आणि निवडणूक लढताना ते पूर्ण तयारीनिशी रणनीती आखताना दिसतात. काँग्रेसमध्ये असलेल्या दुफळीचा त्यांनी फायदा घ्यायचे ठरवले आणि काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या बलवंतसिंह राजपूत यांना भाजपचा तिसरा उमेदवार म्हणून उभे केले. काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी आपले मत दिल्यावर मतपत्रिका पेटीत टाकण्याआधी भाजपच्या तीनही उमेदवारांना दाखवली आणि हा निवडणूक प्रक्रियेचा भंग असून त्यांची मते रद्द करण्यात यावीत यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी अपेक्षित असताना काँग्रेस आणि भाजपाने आपापली शिष्टमंडळे प्रत्येकी ३ वेळा निवडणूक आयोगाकडे पाठवली आणि आपापल्या भूमिका मांडल्या. रात्री ११ नंतर त्या दोन आमदारांची मते रद्द ठरवून मतमोजणी आटपाण्याचे आदेश दिले.हा नाटकीय क्रम एवढ्यावरच थांबला नाही. भारतीय जनता पार्टीने एक विडिओ प्रस्तुत केला आणि त्याआधारे भाजपाला मतदान करणाऱ्या दोन आमदारांनी काहीही चुकीचे केले नाही असे सांगत मतमोजणीला विलंब केला.

शेवटी रात्री १ च्या सुमारास भाजपच्या आक्षेपाला वाटाण्याच्या अक्षता लावत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतमोजणी झाली. दोन आमदारांची मते रद्द होताच निवडून येण्यासाठीची आवश्यक मते ४५ वरून ४४ वर आली आणि काँग्रेसने सुटकेचा निःश्वास सोडला. मतमोजणी पूर्ण होऊन अमित शहांना ४६, स्मृती इराणींना ४५ व अहमद पटेलांना ४४ मते मिळून राज्यसभेची खासदारकी मिळाली. भाजपाचे तिसरे उमेदवार बलवंतसिंह राजपूत यांना ३९ मते मिळाली. अहमद पटेलांच्या ४४ मध्ये काँग्रेसच्या ४१ आणि राष्ट्रवादी, जनता दल (यु) आणि भाजपच्या एका मताचा समावेश आहे. त्यामुळे पटेलांचा हा विजय खरंच विजय आहे का याविषयी प्रश्न उभा राहतो. जर त्या दोन आमदारांनी आपापली मतपत्रे उघड केली नसती तर पटेलांना ४४ आणि राजपूत यांना ४१ मते पडली असती आणि विजयासाठी आवश्यक ४५ मते दोघांपैकी कोणालाही न मिळाल्याने निकाल दुसऱ्या पसंतीच्या मतांवर गेला असता. आणि साहजिकच भाजपच्या जास्त आमदारांच्या जीवावर राजपूत सहज निवडून आले असते. अमित शहांनी जवळजवळ जुळवून आणलेला डाव तांत्रिक कारणामुळे उधळला गेला आणि काँग्रेसचे वस्त्रहरण होता होता राहिले.

निकाल लागले आणि एवढे नाट्य होऊन काँग्रेसचा एक आणि भाजपचे २ खासदार राज्यसभेत पोचले. आता दोनही पक्षांना या निकालांचे विश्लेषण करावे लागेल. ३ महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजपच्या एका आमदाराने काँग्रेसला मतदान केले. त्यासाठी कारण म्हणून पाटीदार समाजावर भाजपने केलेल्या अन्यायाविरोधात आपण मतदान केले असे त्यांनी सांगितले. पाटीदार आंदोलन सध्या थंड पडलेले दिसत असले तरी त्या प्रश्नाच्या अनुषंगाने राज्यसभा निवडणुकीत भाजपचे नाक कापले गेले. कारण दोन आमदारांची मते रद्द झाल्यानंतरही जर या भाजप आमदाराने काँग्रेसला मत दिले नसते तर भाजपचा विजय झाला असता. इथेही भाजपाला एका मताने दगा दिला आणि त्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या लोकांच्या काही आठवणी जाग्या झाल्या असतील यात शंका नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाला आपले घर व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींसारखा चेहरा नाही. पण दोन खासदार निवडून येण्याइतके बळ असताना दोनजण निवडून आले त्यामुळे भाजपासमोरचा प्रश्न काँग्रेसऐवढा भयंकर नाही असेच म्हणावे लागेल. तरीही पक्षाचा राष्ट्रव्यापी विस्तार करताना आणि नवे जोडताना जुने सुटत तर नाही ना याचे भान राखणे भाजपासाठी अत्यंत गरजेचे आहे.

अहमद पटेल विजयी झाले असले तरी हा विजय समाधानापेक्षा जास्त प्रश्न घेऊन उभा राहिला आहे. ६० जणांचे पाठबळ असताना जेमतेम तांत्रिक बाबीवर अखेरच्या क्षणी मिळालेला विजय आनंददायक असण्यापेक्षा चिंताजनकच आहे. शंकरसिंह वाघेलांसारखा मोठा नेता सोडून गेला आहे. राज्यात पूर आलेला असताना आपापल्या मतदारसंघात मदतकार्यात सहभागी होण्यापेक्षा एक राज्यसभेची जागा वाचवण्यासाठी कर्नाटकातील रिसॉर्टमध्ये पार्ट्या करणाऱ्या आमदारांना जनता सहजपणे माफ करू शकेल का याचेही उत्तर शोधावे लागेल. त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये आता जुने आणि नवे असे दोन गट स्पष्टपणे दिसतात. मतदानाच्या दिवशी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला राहुल गैरहजर राहिले हा निव्वळ योगायोग समजावा का? निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळावर नजर टाकली तर गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम, अंबिका सोनी अशी जुनी लोकंच दिसून आली. नव्या गटातील राहुल गांधी, ज्योतिरादित्य सिंदिया, सचिन पायलट आणि नव्यांच्या बाजूचे जुने दिग्विजय अशा लोकांनी फारसे लक्ष घातलेले दिसले नाही. सध्या काँग्रेसमध्ये सोनिया नंबर एक आणि राहुल नंबर दोन आहेत. पण सोनियांचा विश्वास राहुलपेक्षा अहमद पटेलांवर जास्त असावा आणि म्हणून राहुलना पटेल निवडून यायला नको होते का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजतरी आपल्यासमोर नाहीत.

ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये सध्याचा काळ काँग्रेसपुढे अस्तित्वाचे संकट घेऊन उभा आहे असे म्हटले आहे. मोदी आणि शाह यांचे राजकारण आक्रमक स्वरूपाचे असून जर काँग्रेसने स्वतःला नव्या परिस्थितीनुसार बदलले नाही तर काँग्रेस अप्रासंगिक होऊन जाईल असे मत त्यांनी प्रकट केले आहे. जयंती नटराजन, हेमंत बिस्वा शर्मा, रिटा बहुगुणा अशा काँग्रेसच्या अनेक लोकांनी राहुल गांधींच्या क्षमतेविषयी आणि कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. सध्याचे नेतृत्व नेहरू आणि इंदिरा गांधींच्या दशांशानेही सक्षम नाही. तेव्हा अशा गांधी परिवारासाठी काँग्रेससारख्या शतायुषी पक्षाला किती वेठीस धरावे याचा काँग्रेसजन लवकरच विचार करतील. सोनिया आणि राहुलचे राजकारणातील अस्तित्व काँग्रेस पक्षामुळे आहे तसेच काँग्रेस पक्ष सोनिया आणि राहुलमुळे नव्हे तर अनेक लहानमोठ्या नेत्यांमुळे आणि खोलवर रुजलेल्या कार्यकर्त्यांमुळे उभा आहे याचे भान काँग्रेसी लोकांना आले आणि कोणा एका कणखर आणि प्रबळ नेत्याकडे काँग्रेसची धुरा आली तर काँग्रेस वाचणे शक्य आहे. भाजप देशभरात पाय पसरत असताना एक मजबूत राष्ट्रव्यापी विरोधी पक्ष असणे भारतीय लोकशाहीसाठी आवश्यक आहे. नव्या सबळ नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष ही अपेक्षा पूर्ण करू शकतो. पण गांधी घराण्याच्या गुलामीचे जोखड मानेवरून काढून टाकायला आणि भाजपाला पर्याय ठरायला काँग्रेस इच्छुक आहे का हाच देशापुढील मोठा प्रश्न आहे.

Monday, July 31, 2017

नितीशकुमार: जुना गडी नवं राज्य

                   
                    २०१२ पासूनच नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात येण्याचे संकेत मिळत होते. तसेच बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांच्याही राष्ट्रीय राजकारणात महत्वाकांक्षा होत्या. त्यामुळे नितीशकुमारांनी नरेंद्र मोदींना नेहमीच आपला एक प्रतिस्पर्धी या रूपात पहिले. २०१३ साली नरेंद्र मोदींना भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार करताच नितीशकुमारांनी भाजपापासून काडीमोड घेतला आणि धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून मोदीविरोधाचा शंख फुंकला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत अनेकांची पुरती वाताहात झाली. अवघे २ खासदार निवडून आल्यावर नितीशबाबूंना आपल्या शक्तीची कल्पना आली आणि पुढच्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी एकेकाळचे सख्खे मित्र आणि त्यानंतरच्या काळातील पक्के वैरी लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसची मदत घेऊन सत्ता काबीज केली. नितीश, लालू आणि काँग्रेस यांनी साकार केलेल्या या संकल्पनेला महागठबंधन म्हणून संबोधले गेले आणि मोदींना थोपवण्याचा एक मार्ग विरोधकांना दिसू लागला. याच प्रकारे देशातील विविध भागात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन २०१९ मध्ये मोदींना धूळ चारण्याचे मनसुबे आखण्यात येऊ लागले.
                    परंतु केवळ वर्षभरातच बिहारच्या महागठबंधनाला तडे जाऊ लागले. १० वर्षाच्या कालावधीनंतर मिळालेली सत्ता राष्ट्रीय जनता दलाला पचली नाही आणि नितीशबाबूंची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले. भष्टाचाराने डोके वर काढले आणि लालूप्रसाद यादवांच्या घरातील प्रत्येकाची भ्रष्टाचाराची प्रकरणे एकामागोमाग एक बाहेर येत गेली. बायको, मुलगे, मुलगी आणि जावई सगळेच अडकल्यासारखे झाले. स्वतः लालूप्रसाद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत त्यामुळेच त्यांना निवडणूक लढवायला बंदी आहे. बाकीचे कुटुंबही त्याच दिशेने प्रवास करत असल्यासारखे दिसू लागले आणि या साऱ्याचे समर्थन करताना नितीश बाबूंच्या नाकी नऊ आले. राष्ट्रीय जनता दल हे आता नितीशबाबूंचे अवघड जागेचे दुखणे होऊन बसले.
                    पण नितीशकुमारांच्या राजीनाम्यामागे एवढेच कारण आहे असे निदान मलातरी वाटत नाही. याच वर्षीच्या मे महिन्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला ३ वर्षे पूर्ण झाली. देशातील विविध वृत्तवाहिन्यांनी या निमित्ताने जनमत चाचण्या घेतल्या आणि सरसकट सगळ्याच चाचण्यांमध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता टिकून असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारची स्वच्छ प्रतिमा, नोटबंदी आणि सर्जिकल स्ट्राईक सारखे निर्णय व जनधन,उज्वला, पीक विमा इत्यादी योजनांमधून जनमानसात सरकारविषयी सकारात्मक भावना असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यातच उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात निवडणूक झाली आणि भाजपने अभूतपूर्व यश संपादन केले. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या घडीला निवडणूक झाल्या तर भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला २०१४ सालापेक्षाही मोठे यश मिळेल असे भाकीत या वृत्तवाहिन्यांवरील समीक्षकांनी केले. आता अशा परिस्थितीमध्ये अनेक पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी धडपडले तर त्यात नवल ते काय? जे पक्ष भाजपसोबत येऊ शकत नाहीत अशा पक्षातील अनेक नेतेमंडळी भाजपच्या वाटेवर असतीलही. आणि जशी २०१९ ची लोकसभा निवडणूक जवळ येईल तशी अशा प्रकारच्या बातम्यांची संख्या वाढणार हे नक्की.
                   
बिहारमध्ये महागठबंधन चा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर देशभरात अशा प्रकारचा प्रयोग २०१९ मध्ये करावा आणि नितीशकुमारांनी त्याचे नेतृत्व करावे असे अनेक मोदीविरोधकांना वाटत होते. पण बिहारमध्ये लालूंनी आणि काँग्रेसने नितीशना नेतृत्व करू दिले कारण लालूंवर स्वतःवर निवडणूक लढवायला बंदी आहे आणि काँग्रेसचे बिहारमधील अस्तित्व मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याइतके नाही. पण देशपातळीवर परिस्तिथी वेगळी आहे. काँग्रेस हा कितीही कमजोर असला तरी एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि गांधी परिवारातील सदस्यांनी इतर कोणाच्यातरी नेतृत्वाखाली काम करावे या विचारला काँग्रेसमध्ये कोणीही होकार देणार नाही. बंगालमधील ममतादीदीसुद्धा अशा प्रयोगात कितपत साथ देतील हे ब्रह्मदेवही आज सांगू शकत नाही. तसे पहिले तर २०१९ च्या निवडणुकीची रणधुमाळी २०१८ च्या दिवाळीपासूनच सुरु होईल. अशा परिस्थितीमध्ये विरोधी ऐक्याविषयी काहीही प्रगती होत नाही आणि नजीकच्या काळात ती होण्याचे लक्षणही दिसत नाही. त्यामुळे यांच्या भरवशावर राहणे नितीशकुमारांना धोक्याचे वाटले असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको. सध्याच्या विरोधी पक्षाच्या एकत्रीकरणात अडथळा येण्याची कारणमीमांसा करताना एक संस्कृत श्लोक चपखल बसतो.

यत्र सर्वे नेतार: सर्वे पण्डितमानिन:।
सर्वे महत्वमिच्छन्ति तत्र कार्यं विनश्यति ।।
(अर्थ: जिथे सगळेच स्वतःला नेता समजतात, प्रत्येकाला आपणच हुशार असे वाटते आणि प्रत्येकाला महत्व पाहिजे असते, असे काम बिघडते.)

                     नितीशकुमारांनी कट्टर मोदीविरोध करून पाहिला. पंतप्रधानपदावर डोळा ठेवताना हातचे मुख्यमंत्रीपदही जाते की काय अशी वेळ आली. त्यातून सावरण्यासाठी लालू आणि काँग्रेसचा हात हाती घ्यावा लागला आणि आपण आपल्या गळ्यात काय बांधून घेतले याची जाणीवही त्यांना काळानुरूप झाली. गेल्या तीन वर्षात काही ठराविक अपवाद वगळता अमित शहांच्या नेतृत्वाखाली भाजपने अत्र तत्र सर्वत्र यश मिळवले. त्यामुळे मोदींना विरोध करत हातचे गमावण्यापेक्षा सलोखा करून मिळेल तेवढे पदरात पाडून घ्यावे असा सारासार विचार नितीशबाबूंनी केला. त्यामुळे नितीशकुमारांनी चाचपणी सुरु केली. नोटबंदीवरून इतर विरोधी पक्ष सरकारवर टीका करत असताना नितीशनी नोटबंदीचे स्वागत केले. त्यानंतरही अनेक प्रसंगी केंद्र सरकारशी जवळीक करून लालू आणि काँग्रेसला चिडवले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन खुला इशारा केला. आणि अखेरीस लालूपुत्राच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महागठबंधनाची इतिश्री केली.
                     लालू आणि काँग्रेसने नितीशकुमारांवर संधिसाधूपणाचा आरोप केला. पण राजकारणात हे काही प्रथमच झाले नाही आणि आरोप करणाऱ्यांनीही असे डावपेच आजवर अनेकदा केले आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणतात की नितीश भाजपसोबत जातील असे गेल्या ३-४ दिसत होते. हे जर खरे असेल तर नितीशकुमारांसारख्या नेत्याला भाजपच्या गोटात जाण्यापासून परावृत्त करून विरोधी आघाडी बळकट करण्याकडे राहुल गांधींनी लक्ष का दिले नाही हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. अशा विस्कळीत आणि बेसावध विरोधकांमुळेच नितीशकुमारांचा विरस झाला असावा.
                     या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपशी हातमिळवणी करून नितीशकुमारांनी लालूप्रसादांपासून आपली सुटका करून घेतली आणि पुढील काळातील आपल्या यशाची बेगमी करून ठेवली असेच म्हणावे लागेल. 

Thursday, June 29, 2017

लोकप्रतिनिधी कि मालक?


शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार श्री रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याचे वृत्त सध्या चर्चेमध्ये गाजते आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानात बसण्याच्या जागेवरुन वाद झाला. त्यानंतर एअर इंडियाचा कर्मचारी आणि गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. लोकप्रतिनिधी आणि त्यांचे असे किस्से हे काही नवीन नाही. यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक किस्से लोकांनी वेळोवेळी चर्चिले आहेत. कोणी आपलीच मनमानी करतो तर कोणी आपल्यासाठी ट्रेन अथवा विमानाच्या वेळा बदलतो. हे प्रकरणही त्याच मालिकेतील पुढचा भाग आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
रवींद्र गायकवाडांकडे याबद्दल वृत्तवाहिन्यांनी विचारणा केली असता आपण कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या या कृतीचे उद्दामपणे समर्थनच करताना ते दिसत आहेत. लोकप्रतिनिधी असलेल्यांना आवश्यक तेवढा मान सन्मान दिला जावा याबद्दल काहीच दुमत असणार नाही. काहीतरी कर्तृत्व असल्यानेच त्यांना लोकांनी निवडून दिले असावे. परंतु आपल्या पदाचा, समाजातील स्थानाचा आणि एकूणच अस्तित्वाचा इतरांना त्रास होणार नाही असे वर्तन राखणे हे अशा लोकप्रतिनिधींचे कर्तव्यही आहे. मात्र बहुतांश वेळा असे होताना दिसत नाही. देशाचा पंतप्रधान स्वतःला प्रधानसेवक म्हणवून घेत असताना खासदारापासून ते साध्या नगरसेवकांपर्यंत अनेकजण आपण स्वतः जनतेचे मालक असल्याच्या अविर्भावात हिंडताना दिसतात.
आपण लोकप्रतिनिधी आहोत म्हणजे केवळ आपण आपल्या मतदारसंघाचे प्रश्न लोकसभा-विधानसभेत मांडले की आपले काम झाले असे नाही. सार्वजनिक जीवनात काम करताना आपली वर्तणूक ही आपण ज्यांचे प्रतिनिधित्व करतो त्यांना अभिमान वाटेल अशीच ठेवली पाहिजे, कमीत कमी त्यांना लाज आणणारी असू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु हा मुद्दा अनेकदा दुर्लक्षित होतो. अर्थात, अत्यंत साधेपणाने राहणारे आणि सामान्य कार्यकर्त्यांशीही अतिशय अदबीने बोलणारे अनेक नेते होऊन गेले आणि आजही आहेत. त्यांच्याविषयी प्रसारमाध्यमेही काही सांगत नाहीत कारण अशा गोष्टींना TRP नसतो.
अर्थात हा मुद्दा केवळ सत्ता हाती असलेल्या राजकारण्यांपुरता मर्यादित नाहीये. विविध क्षेत्रात अधिकारपदावर असणाऱ्या अनेक लोकांमध्येही याची लागण झालेली आढळून येईल. अगदी गावच्या तलाठ्यापासून जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आणि नगरपालिकेतील जन्म-मृत्यू नोंदणी करणाऱ्या कारकुनापासून ते मंत्रालयातील सचिवांपर्यंत अनेकजण आपल्या अधिकाराच्या गुर्मीत वावरताना दिसतील. समाजाच्या याच घटकांचे प्रतिनिधित्व केल्यामुळे आपले आमदार-खासदार असे वागतात की लोकप्रतिनिधी असे असल्याने खालचे लोक त्यांचे अनुकरण करतात हा प्रश्न म्हणजे कोंबडी आधी की अंडे आधी याच्याइतकाच कठीण आहे.
असं म्हणतात की दैनंदिन वर्तणुकीवरून एखाद्याच्या स्वभावाची,वृत्तीची आणि चारित्र्याची परीक्षा केली जाते. अजून थोडी कठीण परीक्षा करायची असेल तर हलाखीची परिस्तिथी आली तर माणूस कसा वागतो त्यावरून करता येते. अर्थात हलाखीच्या परिस्थितीमध्येही धैर्य, संयम आणि चांगुलपणा धरून ठेवणारे अनेकजण मिळतात. पण जर एखाद्याच्या वृत्तीची खरी परीक्षा पाहायची असेल तर त्याच्या हाती अधिकार आणि सत्ता असताना केलेल्या त्याची वागणूक कशी आहे यावरून पाहता येईल. दुर्दैवाने अधिकार आणि सत्ता हाती आल्यावर अनेकांची मदांध आणि दुराग्रही बाजूच पुढे येताना दिसते. 
रवींद्र गायकवाडांच्या प्रकरणात काय सत्य आहे ते कालांतराने उघड होईलच. सर्व भारतीय विमान कंपन्यांनी एकत्रितपणे त्यांच्यावर बहिष्कार घातला असून त्यांची परतीची तिकिटे रद्द केली आहेत. सरकारही काही कायदेशीर कारवाई करता येईल का याविषयी आढावा घेत आहे आणि शिवसेना नेतृत्वानेही आपल्या खासदाराच्या वागणुकीची दाखल घेत त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी बोलावले आहे. अर्थात लोकशाहीमध्ये अशा लोकांचा उन्माद उतरवण्याची संधी जनतेकडे आहे आणि वेळोवेळी जनतेने त्याचा वापरही केला आहे. फळांनी लगडलेला वृक्ष जसा झुकतो तसेच सत्तेच्या अधिकारपदावर असणारे लोक त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव होऊन विनम्रपणे वागतील तोच सुदिन.
(सदर लेख marathi.rightlog.in वर मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झालेला आहे)